रक्षा खडसे (भाजप) - रावेरभापारंपरिक वर्चस्व असलेल्या या मतदारसंघात तत्कालीन खासदार हरिभाऊ जावळे यांना डावलून एकनाथ खडसे यांनी आपली स्नुषा रक्षा यांना उमेदवारी देण्यास भाग पाडले. निवडणुकीत स्वत: नाथाभाऊंनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती. राजकारणात तशा नवख्या असलेल्या रक्षा चांगल्या मताधिक्याने विजयी झाल्या. निवडून आल्या तरी रक्षा खडसे यांनी मतदारसंघात तेवढा संपर्क ठेवलेला नाही. राज्य मंत्रिमंडळात एकनाथ खडसे यांच्याकडे अनेक खात्यांची जबाबदारी आल्याने त्यांनाही मतदारसंघात तेवढा वेळ देणे शक्य होत नाही. मतदारसंघात मोठय़ा उद्योगांना चालना देऊन रोजगारनिर्मिती व्हावी अशी जनसामान्यांची अपेक्षा आहे. सहकारी कारखान्यांची स्थिती बिकट आहे. केळी उत्पादक परिसर असल्याने केळी प्रक्रिया उद्योग उभारणे आवश्यक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाला बाजारपेठ उपलब्ध होऊ शकते. रेल्वेशी संबंधित प्रश्नही ‘जैसे थे’ आहेत. सिंचनाचे प्रश्नही मार्गी लागलेले नाहीत. ग्रामीण भागातील रस्त्यांची स्थिती बिकट आहे. आता या परिसराच्या विकासाकरिता स्वत: एकनाथ खडसे यांना लक्ष घालावे लागणार आहे. विविध प्रश्नांवर पाठपुरावा सुरूमतदारसंघाच्या विकासासाठी लोकसभेत वर्षभरात अनेक प्रश्न मांडले. त्याबाबत पाठपुरावाही सुरू आहे. भुसावळ रेल्वे स्थानक अद्ययावत करून प्रवाशांसाठी जादा गाडय़ा सुरू करण्याची मागणी केली आहे. मतदारसंघात अनेक रेल्वे उड्डाण पुलांची कामे प्रस्तावित आहेत. पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना मिळावी म्हणूनही प्रयत्न केले जात आहेत. तापी व सातपुडा मेगा रिचार्ज योजनेचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. राष्ट्रीय महामार्गासह रस्ते दुरुस्तीची कामेही केली जाणार आहेत. जनताच पावती देईल- मनीष जैन (राष्ट्रवादी काँग्रेस)रावेर मतदारसंघात खासदारांनी केलेले कार्य जनतेसमोर आहे. त्यांनी केलेल्या कामाची पावती जनताच देऊ शकते. जर जनता समाधानी असेल, खूश असेल तर आपला प्रश्न उद्भवतच नाही.संकलन: मुकेश पवार