शहराच्या मध्यवर्ती भागासह नाशिकरोड, सिडको परिसरात होणाऱ्या गुन्हेगारीविषयक घडामोडी आता हळूहळू शहराच्या इतर भागातही फैलावू लागल्या असून पंचवटीतील महामार्गालगतच्या परिसरावर आता चोरटय़ांनी लक्ष्य केले आहे.
मागील काही दिवसात हनुमाननगर, कोणार्कनगर, हॉटेल जत्रामागील परिसर या भागात सोनसाखळी हिसकाविणे, लूटमार, हाणामारी, चोरी यांसारख्या प्रकारांमध्ये वाढ झाली आहे. विशेष म्हणजे हाकेच्या अंतरावर आडगाव पोलीस ठाणे असतानाही हॉटेल जत्रापासून  नांदूर नाक्याकडे जाणारा रस्ता दुचाकी वाहनधारकांच्या लुटमारीचे केंद्रबिंदू बनू लागला आहे.
महामार्गावर वाढलेल्या दारू दुकानांची संख्या, बियर बार, हॉटेल्स यामुळे गुन्हेगारीत भर पडत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. रात्री उशिरापर्यंत सुरू राहणाऱ्या बियर बार आणि हॉटेल्सवर पोलिसांचे कोणतेही र्निबध नसल्याचे या परिसरात दिसून येते. अलीकडेच हॉटेल कुणालमध्ये रात्री उशिरा मद्याची मागणी करणाऱ्या टोळक्यास नकार दिल्यावर हॉटेल व्यवस्थापकास चाकुने भोसकण्याचा प्रकार घडला. हॉटेल व्यावसायिकांमध्ये सुरू असलेली जीवघेणी स्पर्धाही परिसरातील शांततेला बाधा आणत आहे.
हॉटेल जत्रामागील रस्त्यावर मागील आठवडय़ात एका शिक्षिकेची सोनसाखळी खेचण्याचा प्रकार घडला. तर, पोलीस ठाण्यासमोरच एका महिलेचे दागिने ओरबाडण्यात आले. या रस्त्याने एकटय़ा महिलेने दुचाकीवरून जाणे किंवा पायी फिरणेही किती धोकादायक झाले आहे, हे यावरून दिसून येईल. कोणार्कनगर, हनुमाननगर येथील बाजारांमध्ये ग्राहकाचे पाकीट मारण्याचे प्रकार वारंवार होत आहेत. हे सर्व प्रकार घडत असताना पोलिसांकडून कोणतीच कार्यवाही होत नसल्याने परिसरातील वसाहतींमधील नागरिकांमध्ये असंतोष आहे.
या परिसरातील सव्‍‌र्हिस रोडवर ठिकठिकाणी अवैध धंद्यांचे पेव फुटले आहे. बिडी कामगार नगर चौफुली, धात्रक फाटा, लक्ष्मीनगर, रासबिहारी चौफुली, हॉटेल जत्रा परिसर या सर्व भागात अवैध फलकांचा सुळसुळाट असतो. अवैध पध्दतीने उभे राहणारे हे अवैध फलकही अपघातांना कारणीभूत ठरत आहेत. राजकीय पदाधिकाऱ्यांचे पाठबळ अशा प्रवृत्तींमागे उभे राहात असल्याने पदाधिकाऱ्यांकडे तक्रार करणेही अशक्य होऊन बसते. पोलिसांनी या भागात डोके वर काढू पाहणारी गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी कठोरपणे कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.