राज्याचे नव्या औद्योगिक धोरण म्हणजे ‘हाऊसिंग पॉलिसी’ असल्याची टीका मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज पत्रकारांशी बोलताना फेटाळून लावली. अशा पद्धतीने राष्ट्रवादीने केलेली टीका चुकीची असून उद्भवलेले गैरसमज दूर केले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले. आजपर्यंतची धोरणे राबवूनही औद्योगिक क्षेत्रांच्या जागांवर अतिक्रमित झोपडपट्टय़ाची बजबजपुरी माजल्याचे चित्र दिसले आहे. त्यामुळे ४० टक्के जागा हाऊसिंगसाठी आरक्षित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. यातून होणारी टीका अनाठायी आहे, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी औद्योगिक धोरणाचे जोरदार समर्थन केले.
आंध्र, पंजाब सरकारांनी गुंतवणूकदारांना मोफत भूखंडाचे धोरण राबविलेले आहे, याचे उदाहरण देऊन मुख्यमंत्री म्हणाले, सरकारांनी अटी-शर्ती निर्देशित करण्याचे जुने दिवस सरलेले आहेत. गुंतवणूकदारांना संधी/सवलती दिली जात असताना उद्योग वेळेत उभारणे, उत्पादन सुरू करणे या गोष्टीसुद्धा औद्योगिक जगताकडून अपेक्षित आहेत. एकखिडकी योजनेतून उद्योगांना सर्व क्लिअरन्स मिळेल, यावर सरकारही भर देत आहे. यातून फायदा हा स्वतंत्र विषय असू शकेल, परंतु, नव्या धोरणावर होणारी टीका एकतर्फी आहे, असे मला वाटते.
 उदारतेचे असून उद्योग क्षेत्रात नवे बदल घडवून आणणारे निश्चित ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला. गुंतवणूकदारांना फक्त गुंतवणुकीचे आकर्षण दाखविणारे पारंपरिक औद्योगिक धोरण बदलून उद्योगाला नवी दिशा देण्याचा प्रयत्न सरकारने केलेला आहे, राज्याच्या तिजोरीवर पडणारा भार कमी करणे, मोठय़ा शहरांवरील वाढता दबाव कमी करणे, नियोजनबद्ध उद्योग निर्मिती, रोजगार संधींची उपलब्धता आणि उद्योग क्षेत्रात काम करणाऱ्यांचे जीवनमान उंचावणे या उद्दिष्टांसह तयार झालेले धोरण बरेच बदल घडवून आणेल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

मौदा कार्यक्रमाची क्षणचित्रे
 कार्यक्रमाच्या पत्रिकेत नाव नसल्यामुळे भाजपचे स्थानिक आमदार चंद्रशेखर बावनकुळे, शिवसेनेचे रामटेकचे आमदार आशीष जैस्वाल व भंडाऱ्याचे आमदार नरेंद्र भोंडेकर हे प्रेक्षकांमध्ये बसले होते. राजेंद्र मुळक यांच्यासह अनेकजणांनी अनेकदा आग्रह करूनही ते व्यासपीठावर जायला तयार नव्हते. अखेर पालकमंत्री शिवाजीराव मोघे हे व्यासपीठावरून खाली उतरून आल्यानंतर मोठय़ा प्रयासाने हे तिघे आमदार व्यासपीठावर गेले. कार्यक्रम सुरू होताच हे ‘नाराजी नाटय़’ रंगले. शिंदे यांनी त्यांना उद्देशून भाषणात टोलाही लगावला.
 मुकुल वासनिक यांनी भाषणाला सुरुवात करताच प्रेक्षकांमधून काहीजण उभे राहून ‘प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडवा’, ‘प्रकल्पग्रस्तांना नोकऱ्या मिळाल्याच पाहिजेत’ अशा घोषणा देऊ लागल्याने वातावरण तंग झाले. पोलीस अधीक्षक मनोजकुमार शर्मा यांना तर रागावर नियंत्रण ठेवणे कठीण जात होते. पाचेक मिनिटे घोषणाबाजी झाल्यानंतर पोलिसांनी घोषणा देणाऱ्यांना बळजबरीने बाहेर नेले. ज्योतिरादित्य शिंदे व पृथ्वीराज चव्हाण या दोघांनीही भाषणात या घोषणांची दखल घेतली.
 मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यासपीठावरील उपस्थितांची नावे घेताना राजेंद्र मुळक यांच्याऐवजी ‘राजेंद्र दर्डा’ असा उल्लेख केला.