विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा व उत्कंठा असल्याशिवाय त्यांना जीवनात काहीही प्राप्त होणार नाही, असे मत मुंबईतील होमी भाभा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशनचे डॉ.सुधाकर आगरकर यांनी व्यक्त केले. ब्राह्मण सभा, कुतहूल संस्कार केंद्र, अकोला आणि जिज्ञासा ट्रस्ट, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय आंतरशालेय विज्ञान प्रश्नमंजूषेच्या पारितोषिक वितरण समारंभाचे प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.
यावेळी बोलताना डॉ.सुधाकर आगरकर म्हणाले की, सामाजिक बदलाची प्रक्रिया सुरुवातीला संथ असते. त्याची व्याप्ती वाढायला वेळ लागत नाही. विज्ञानावर आधारित प्रश्नमंजूषेचे रोपटे डौलदार होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या स्पर्धेचे विजेतेपद मालाड मुंबईच्या चिल्ड्रेन अकादमीने पटकावले. तुषार अंबेलकर आणि जोनाथन नादर यांना अतिथींच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. द्वितीय क्रमांक सुलोचनादेवी सिंघानिया स्कूल ठाणेच्या तरीष सेन व देबार्ध गांगुली, तृतीय राजा शिवाजी विद्यालय दादरच्या ऋषीकेश पवार व अभिषेक गांगन, तर चौथा क्रमांक अकोल्याच्या बाल शिवाजी शाळेतील अवनी खोडकुंबे व शर्वरी रुपदे यांच्या चमूला मिळाला.
 ब्राह्मण सभा सभागृहात झालेल्या कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष अविनाश देव, कुतूहलचे डॉ.नितीन ओक, प्रा.मोहन गद्रे व्यासपीठावर उपस्थित होते. या स्पर्धेसाठी सुहास उदापूरकर, प्रा.राजेश जोध, अर्चना पंडीत, अनंत गद्रे यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे संचालन व आभार खेर यांनी मानले.