केंद्रात आणि राज्यात सत्ता बदलामुळे कल्याण-डोंबिवली महापालिकेतील सत्ताधारी शिवसेना नेत्यांचे विमान गगनभरारी घेऊ लागल्याचा प्रत्यय नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत सर्वाना आला. नगरसेवकांची कामे होत नसल्याची ओरड सुरू असताना आयुक्त रामनाथ सोनावणे यांनी अधिकाऱ्यांच्या चौकशीचा मुद्दा अलगद पुढे रेटला आणि सत्ता बदलामुळे निर्धास्त झालेल्या शिवसेना नगरसेवकांनी त्यावर उत्तर म्हणून आयुक्त साहेब तुम्ही चौकशीला घाबरू नका..पालकमंत्री आपलेच आहेत, असा सूर लावत सर्वानाच आश्चर्याचा धक्का दिला. महापालिकेचा अर्थसंकल्प मंजूर होऊन आठ महिने झाले तरी, नगरसेवकांच्या विकास कामांच्या नस्ती (फाइल्स) अधिकाऱ्यांच्या टेबलांवरून पुढे सरकत नाहीत. ‘नगरसेवकांची कामे होत नाहीत हे वास्तव आहे, अशी कबुली देताना आयुक्तांनी कामे होणार तरी कशी, असा प्रतिसवाल केला. एखादे काम करायला गेलो, तर त्याच्या तक्रारी केल्या जातात. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, ‘सीबीआय’पर्यंत तक्रारी केल्या जातात. प्रशासनामागे चौकशीचा ससेमिरा लावला जातो. अशा वेळी लोकप्रतिनिधी मूग गिळून बसतात. प्रशासनाच्या पाठीशी कोणीही खंबीरपणे उभे राहत नाही’ अशी खंत त्यांनी व्यक्त केली. या वक्तव्यावर शिवसेनेचे गटनेते रवींद्र पाटील यांनी केंद्र आणि राज्यात आपलीच सत्ता आहे. पालकमंत्री आपलेच आहेत. काय होईल ते पुढे बघून घेऊ’ असे उत्तर दिले. याच पाटील यांनी दोन महिन्यांपूर्वी सभेत अध्यादेश पन्नास हजार रुपयात तशा आशयाचे करून मिळतात. असे विधान करून खळबळ उडून दिली होती.