समाजाने मनोरुग्ण ठरवलेल्या व्यक्तीवर उपचार होणे ही काळाची गरज असताना कायद्याच्या त्रुटीमुळे काही मनोरुग्णांना उपचारच मिळत नाहीत. असे मनोरुग्ण मग रस्त्यावर फिरत असतात. या मनोरुग्णांकडे समाजातील कोणत्याच घटकांचे लक्ष जात नसल्याने त्यांचा वाली कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे. मनोरुग्ण असल्याचे सिद्ध झाल्यानंतरच न्यायालयाच्या आदेशाने कुटुंबातील व्यक्ती अथवा पोलिसांतर्फे त्या व्यक्तीला दाखल करून घेतले जाते. शहरात रस्तोरस्ती फिरणारे शेकडो मनोरुग्ण आहेत, ते केवळ औषधोपचाराने बरे होऊ शकतात. परंतु त्याची जबाबदारी त्यांचे कुटुंबीय, समाज व शासनही घेण्यास तयार राहात नाही. परिणामी या मनोरुग्णांना रस्त्यावरच जीवन जगावे लागत असल्याचे दिसून येते. एमबीबीएस अभ्यासक्रमातील ‘डिप्लोना इन पब्लिक हेल्थ’ या विषयाच्या पुस्तकामध्ये मानसिक आजाराने ग्रस्त ९५ टक्के रुग्ण हे केवळ औषधोपचाराने बरे होऊन आपल्या घरी जाऊ शकतात, तर केवळ ५ टक्के मनोरुग्णांना मनोरुग्णालयात ठेवूनच उपचार करावा लागतो, असा उल्लेख आहे. मनोरुग्णांच्या तुलनेत मानसोपचार तज्ज्ञांची संख्या कमी आहे. १९९१ च्या सर्वेक्षणानुसार देशात २९ हजार १४७ इतक्याच खाटांची सुविधा आहे. तर एक कोटी १० लाख मनोरुग्ण देशात असल्याचा अंदाज आहे. रुग्णांच्या खाटांची संख्या तीन लाख असल्याचा दावा केंद्र सरकार करते. तर महाराष्ट्रातील नागपूर, ठाणे, रत्नागिरी आणि पुणे या चार रुग्णालयात जवळपास फक्त पंधराशे खाटांची व्यवस्था आहे. एकटय़ा नागपूर शहरात एक हजार मनोरुग्ण रस्त्यावर फिरत असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. हे मनोरुग्ण शहरातील मंदिर, दरगाह, बसस्थानक, चौक, मोठा ताजबाग, शनी मंदिर, साई मंदिर, कोराडी मार्गावरील मनोरुग्णालय परिसर, गणेश टेकडी मंदिर, मोमीनपुरा, छोटा ताजबाग, यशवंत स्टेडियम, परिसरात मोठय़ा संख्येने दिसून येतात. मनासारखे घडत नसल्याने मनोरुग्ण हल्ला करून दहशत पसरवितात. कुटुंब, समाज व शासनही या घटकांकडे सहानुभूतीने बघत नाही, त्यामुळे या मनोरुग्णांची जबाबदारी उचलण्यासाठी सामाजिक संघटनांनी पुढाकार घेतला पाहिजे, असा सूर बुद्धिवाद्यांमध्ये दिसून येतो. मनोरुग्णांना सामाजिक नागरिकांसारखे जीवन जगावे यासाठी महाराष्ट्रात चार ठिकाणी मनोरुग्णालय स्थापन करण्यात आले. यामध्ये नागपूर, ठाणे, रत्नागिरी व पुणे या शहरांचा समावेश आहे. नागपुरातील मनोरुग्णालयात खाटांची संख्या ४०० एवढी आहे. याशिवाय शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ३० खाटांची व्यवस्था आहे. सर्वच रुग्ण वेडे नाहीत, असा निष्कर्ष काढून या रुग्णावर चार टप्प्यात उपचार केले जातात.