अभ्यासातील असमर्थता अर्थातच ‘डिस्लेक्सिया’ या आजारावर उपचार असून पालक आणि शिक्षकांकडून योग्य सहकार्य मिळाले तर अशी मुले हमखास ठीक होऊ शकतात, असे मत बालमानसोपचार तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. फेब्रुवारी-मार्चपासून पहिली ते दहावीच्या परीक्षा सुरू होणार आहेत, पण मुले अभ्यास करत नाही, अभ्यासात लक्षच लागत नाही, लक्षात राहत नाही, शब्दांचे उच्चार करण्यास अडचण येते, चांगले गुण मिळत नाही, अशा तक्रारी अनेक पालकांच्या असतात. असा आरोप करणाऱ्या पालकांच्या मनात मुलांची समस्या मानसिक स्वरूपाची आहे, त्याला मानसोपचार तज्ज्ञांची गरज आहे, हा साधा विचार मनात येत नसतो. अशा मुलांना त्यांच्या पालकांनी मानसोपचार तज्ज्ञांकडे नेले तर तो मुलगा हमखास बरा होऊ शकतो, असे मत बालरोग व बालमानसोपचार तज्ज्ञ डॉ.राजेंद्र पाटील यांनी व्यक्त केले. ‘डिस्लेक्सिया’ अर्थात, अभ्यासातील असमर्थता या आजाराची लक्षणे सांगताना डॉ. पाटील म्हणाले, अशा मुलांना लहान-लहान शब्द लक्षात ठेवण्यास त्रास जातो. दोन शब्द वेगळी करणारी अक्षरे जसे पॅड, पॅट, पॅन समजण्यास त्यांचा मेंदू असमर्थ असतो. त्यामुळे मुलांचे लक्ष लागत नाही, पण इतर विषयात ती हुशार असतात. हा आजार असलेली मुले फार उशिरा बोलू लागतात. त्यांना शब्दांचे उच्चार करण्यास अडचण निर्माण होते. नाव लक्षात ठेवणे कठीण जाते. विशिष्ट शब्दांची निवड, स्वर जुळविणे त्यांना जमत नाही. सारख्या दिसणाऱ्या अक्षरांमध्ये त्यांचा फार घोळ होत असतो. अंकांची क्रमवार मांडणी त्यांना जमत नाही. एखादा क्रम समजून लक्षात ठेवणे त्यांना कठीण जाते. स्पेलिंग आणि अक्षराच्या मांडणीत त्यांना त्रास होतो. दिशा ओळखतांना गोंधळ उडतो. गणित समजण्यास कठीण जाते. अशा मुलांची अक्षरे फारच खराब असतात. अशी लक्षणे असल्यामुळे ती मुले अभ्यासात मागे पडतात आणि शाळेकडून ‘शिक्षणात असमर्थ’ असे प्रमाणपत्र पालकांना मिळते. यामुळे पालकांची स्थिती फारच विचित्र होते. या मुलांना योग्य औषधोपचार व समुपदेशन केल्यास त्यांच्या व्यवहारात निश्चितच बदल घडून येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. काही मुले अती चंचल, तर काही मुले अतिशय मंद असतात. हा सर्व घरातील वातावरण आणि संस्काराचा परिणाम असतो. मंदबुद्धीची मुले शाळेतील अभ्यासात नेहमीच मागे पडतात, याची चिंता त्यांच्या आईवडिलांना तर असतेच पण, शिक्षकही त्यांना शिकवण्यास तयार नसतात. शिकण्यास असमर्थ, असा ठपकाही या मुलांवर लावण्यात येतो. शाळेतून आलेले रिपोर्ट कार्ड बघून आईवडिलही घाबरून जातात आणि आपल्या मुलाच्या भवितव्याचे काय होईल, या चिंतेत अडकतात. हळूहळू आईवडिलही त्या मुलाकडे दुर्लक्ष करू लागतात. योग्य औषधोपचार व समुपदेशाने तो ठीक होऊ शकतो, असा विश्वास पालकांनी ठेवला पाहिजे, असे मत बालरोगतज्ज्ञ डॉ. राजीव मोहता यांनी व्यक्त केले.समुपदेशन अधिक महत्त्वाचे, बालमानसोपचार तज्ज्ञांचे मत तीन ते चार टक्के मुलांमध्ये अशा समस्या असतात. जसजसे ते मोठे होतात, तसतसे या समस्या काही प्रमाणात दूर होतात, पण त्या जेव्हा दूर होत नाही, तेव्हा अशा मुलांचे समुपदेशन करणे महत्त्वाचे असते. यावर ठोस असे औषध नसले तरी काही औषधे दिले जातात. मुलगा अभ्यासात असमर्थ असल्याची जाणीव आईवडील व शिक्षकांना असणे आवश्यक आहे. अशा मुलांना हे जमत नाही, ते जमत नाही, असे सांगून आणखी त्यांचे मानसिक खच्चीकरण करणे आवर्जून टाळावे. आईवडील आणि शिक्षकांनी अशा मुलांमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. डॉ. अविनाश जोशी (मानसोपचार तज्ज्ञ)