वनस्पतींना भावना असतात. आपले विचार, प्रार्थना आणि संगीताचा वनस्पतींवर परिणाम होतो असे डॉ. जगदीशचंद्र बोस, काव्‍‌र्हर, बॅकस्टर या शास्त्रज्ञांनी संशोधनातून सिद्ध केले आहे. या संशोधनाच्या आधारे शेतकऱ्यांच्या मदतीने शेतामध्ये निरनिराळे प्रयोगही सुरू आहेत. प्रदूषणाचा विळखा पडलेल्या गणशोत्सवालाही पर्यावरण रक्षणाचे कोंदण देण्यासाठी आता ‘वनस्पती गणपती’चा प्रयोग सुरू झाला असून गव्हांकुरांचा गणपती मूळ धरू लागला आहे.
गणपतीची सर्व रूपे निसर्गाशीच निगडित असतात. स्वाभाविकच गणपतीच्या निमित्ताने निसर्गाची हानी होणार नाही याची काळजी गणेशभक्तांनी घेणे अभिप्रेतच आहे. ते होत नाही आणि पर्यावरणाचा प्रचंड नाश होतो हा दैवदुर्विलास म्हणायचा. या पाश्र्वभूमीवर गव्हांकुर ओंकाराचा प्रयोग सगळ्यांनीच समजून घेणे आवश्यक आहे.
गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी मोठय़ा परातीमध्ये मातीची सुबक रचना करून त्यावर गणेशाचे चित्र आखण्यात येते. गणेशाच्या आकाराच्या आधाराने मातीमध्ये गहू बीजांचे रोपण केले जाते. त्यातून तयार होतो ‘वनस्पती गणपती’. गणेश चतुर्थीच्या दिवशी साग्रसंगीत पूजेसह ‘वनस्पती गणपती’ची प्रतिष्ठापना केली जाते. दिवसभरातून एकदा त्यावर समंत्रक पाणी प्रोक्षित केले जाते. हळूहळू बीज अंकुरते आणि गव्हाची हिरवीगार पाती बाहेर येतात आणि दर्शन घडते ते ‘वनस्पती गणपती’चे.
या ‘वनस्पती गणपती’चे पाचव्या दिवशी विसर्जन केले जाते. विसर्जनाची पद्धतही प्रतिष्ठापनेला साजेशीच आहे. मुंबई-पुण्यात होणाऱ्या ढोल-ताशाचा गजर नाही, की मिरवणुकीचा मोठा बडेजाव नाही. अगदी साध्या पद्धतीने हा सोहळा उरकला जातो. विसर्जनासाठी कुठल्या नदीवर वा तलावावर जावे लागत नाही. गणेएशरूपी वनस्पतीची पाती प्रार्थनापूर्वक काढण्यात येतात. भोजनामध्ये मिसळण्यात येणारी ही पाती प्रसाद म्हणूनच भक्षण केली जातात. ‘वनस्पती गणपती’साठी वापरण्यात येणारी माती झाडांना वाहण्यात येते. लोणावळय़ातील ‘मनशक्ती केंद्रा’त पर्यावरणस्नेही गणेशोत्सवासाठी हा नवा ओमकार मंत्र दिला आहे.