मावळ लोकसभा निवडणुकीच्या नंतर ठाणे लोकसभा संघाच्या निवडणुका निर्वघ्नपणे पार पाडण्यासाठी नवी मुंबई पोलिसांनी शहरात चोख बंदोबस्त ठेवला होता. कोणतीही परिस्थिती हाताळण्यास पोलीस यंत्रणा सक्षम असल्याची ग्वाही देत, पोलिसांनी मतदारांना निर्भयपणे मतदानासाठी बाहेर पडण्याचे आवाहन केले होते. पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद देत शहरात मतदार मोठय़ा संख्येने मतदानाला बाहेर पडल्याचे चित्र होते. सकाळपासूनच मतदान केंद्रांवर असलेली गर्दी दुपारी रणरणत्या उन्हातदेखील कायम होती. मतदान प्रक्रिया निर्भय आणि शांततेत पार पडण्यासाठी पोलीस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली ६ पोलीस उपायुक्त, ११ साहाय्यक पोलीस उपायुक्त, १५० पोलीस अधिकारी आणि साडेचार हजार पोलीस कर्मचाऱ्यांसह होमगार्ड, सीआयएसएफ, एसआरपीएफ जवान कार्यरत होते. मतदानाच्या सर्व प्रक्रियेवर पोलीस आयुक्त आणि अतिरिक्त पोलीस आयुक्त बारीक नजर ठेवून होते. यामुळे ऐरोली विधानसभेत ३७० आणि बेलापूर विधानसभेत ३५८ मतदान केंद्रावर शांततेत मतदान प्रक्रिया सुरू असल्याचे चित्र होते. मतदान केंद्रांवर समाजकंटकांकडून कोणताही गोंधळ होऊ नये यासाठी रायफलधारी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्याशिवाय संवेदनशील केंद्रांवर सीआयएसएफचे जवानही तनात करण्यात आले होते. मतदान काळात मतदाराला कोणतेही दडपण अथवा आमिष दाखवले जाऊ नये यासाठी तीन फ्लाियग स्क्वॉड व तीन एसएसटीची पथके कार्यरत होती. त्याचप्रमाणे काही मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते.