उन्हाळ्याच्या अखेरीस निर्माण झालेल्या वीजनिर्मिती केंद्रातील नादुरुस्तीचा फटका सहन करून वीजपुरवठा सुरळीत होण्याची अपेक्षा बाळगणाऱ्या ठाणेकरांना पावसाळ्यातील तांत्रिक बिघाडाचा फटका सहन करावा लागत आहे. पावसाळा सुरू होताच ठाणे-कळवा परिसरात वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढीस लागले असून या भागामध्ये काही ठिकाणी वीजवाहिन्यांमध्ये दोष निर्माण होत असल्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.
वीज वापर कमी होत असताना भारनियमन असलेल्या भागातील वीज ग्राहकांना भारनियमनातून सुटका होण्याची शक्यता असते. मात्र यंदा वारंवार होत असलेल्या तांत्रिक बिघाडामुळे भारनियमन नसलेल्या भागातील नागरिकांनाही अघोषित भारनियमनाचा फटका सहन करावा लागत आहे. ठाणे शहरातील नौपाडा या मध्यवर्ती भागामध्ये दिवसातून एक ते दीड तास वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटना घडत असून शहरातील अन्य भागांमध्ये ही परिस्थिती कायम आहे. कळवा परिसरात पावसाच्या पहिल्याच रात्री साडेचार तासांहून अधिक काळ या भागातील वीजपुरवठा खंडित झाला होता. वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले असले तरी हा भारनियमनाचा प्रकार नसून उन्हाळ्यामध्ये वीजनिर्मिती केंद्रात झालेल्या बिघाडाचा हा फटका आहे. तो पूर्ववत होण्यासाठी अर्धा ते एक तास वेळ लागतो. तसेच मोठय़ा पावसाची, वादळाची शक्यता निर्माण झाल्यास अपघात होऊ नये यासाठीही काही वेळा वीजपुरवठा खंडित केला जातो. त्यामुळे हा त्रास नागरिकांनाच होतो, अशी माहिती महावितरणचे भांडुप परिमंडळाचे जनसंपर्क अधिकारी धनंजय पवार यांनी दिली.