यावल अभयारण्यातील जामन्या वन्यक्षेत्रात असलेल्या सारीसुमरी व रंजपाणी येथील अनधिकृत झोपडय़ा हटविण्याची मोहीम सुरू झाली आहे.
यावल अभयारण्य १७७.५८ चौरस किलोमीटरमध्ये पसरलेले असून जामन्या वन्यक्षेत्रात जामन्या, पांढऱ्या, उसमुळी, लंगडाआंबा अशी वसतीस्थाने आहेत. यातील लंगडाआंबा हे महसूल दर्जा नसलेले अनधिकृत गाव आहे. लंगडाआंबा येथील काही भागात कारवाई करून येथे मध्यप्रदेशातील व स्थानिकांनी केलेले अतिक्रमण हटविण्यात आले आहे. आता साखरीसुमरीच्या ३० झोपडय़ा आणि रंजपाणी येथील ७० झोपडय़ा हटविण्याची तयारी सुरू आहे. महाराष्ट्रात पहिल्यांदाच वन्य क्षेत्रातील अनधिकृत झोपडय़ा हटविण्याच्या कामास सुरूवात करण्यात आली आहे.
यासाठी दोन जेसीबी, २२ ट्रॅक्टर, ३०० पेक्षा अधिक पोलीस, राखीव सुरक्षा दल तसेच वनरक्षक असा ताफा आहे. झोपडी पाडणे, लाकडी माल उचलणे आणि हद्दीच्या बाहेर काढणे असे स्वरुप असून सातपुडा वनक्षेत्रात सागाची झाडे तोडून शेती कसली जात असल्याची तक्रार आहे. १३ डिसेंबर २००५ पूर्वी जंगलात राहणाऱ्यांच्या तीन पिढय़ा म्हणजे ७५ वर्षे प्राथमिकदृष्टय़ा जंगलात राहणाऱ्यांचा या कारावाईत अपवाद केला जात आहे. पाल व जामन्याचे वनक्षेत्रपाल सुरेश पाटील यांनी अतिक्रमणाविरोधात वनखात्याने अभियान सुरू केल्यावर लोकसंघर्ष मोर्चाने जिल्हाधिकाऱ्यांवर दबाव आणल्याने कारवाईस स्थगिती मिळविली होती, असे सांगितले. तर,
लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे यांनी ग्रामसभेत दाखल झालेल्या दाव्यांबद्दलच आमची भूमिका असल्याचे सांगितले.