गोदावरी स्वच्छता व सौंदर्यीकरण या ध्येयाने प्रेरित होऊन विविध उपक्रम राबविणाऱ्या येथील ऊर्जा युवा प्रतिष्ठानतर्फे गणेशोत्सवानिमित्त सलग सातव्या वर्षी ‘ऊर्जा निर्माल्य पिशवी’ अभियान सुरू करण्यात आले आहे. यावर्षी महानगरातील ६७ शाळांमधून या ऊर्जा निर्माल्य पिशव्यांचे वाटप करण्यात येणार असून याची सुरूवात मराठा विद्या प्रसारक समाजाच्या गंगापूर रोडवरील अभिनव बालविकास मंदीर या शाळेपासून करण्यात आली.गणेश मूर्ती विसर्जनवेळी भाविकांकडून निर्माल्य नदीत टाकले जाते. त्यामुळे जल प्रदूषणात भर पडून गोदावरीच्या स्वच्छतेस बाधा येते. गोदावरीचे सौंदर्य कायम राहण्यासाठी ऊर्जा प्रतिष्ठानकडून प्रयत्न करण्यात येत असून गणेशोत्सवात निर्माल्य पिशव्यांचे वाटप हा त्याचाच एक भाग होय. अभिनव बालविकास मंदीर शाळेत प्रतिष्ठानतर्फे सुमारे दोन हजार विद्यार्थ्यांना निर्माल्य पिशव्यांचे वाटप ऊर्जा युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अजय बोरस्ते यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमप्रसंगी प्रतिष्ठानचे दीपक हांडंगे, विकास बिरारी, कैलास लोणे, राहुल डागा आदी उपस्थित होते.विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संरक्षण आणि जलप्रदूषण रोखण्यासंदर्भात जागरूकता निर्माण व्हावी, गोदावरी प्रदूषित होत असल्याने त्याचे कोणते दुष्परिणाम उद्भवतात याची जाणीव व्हावी हा या उपक्रमाचा हेतू आहे. गणेश उत्सवाच्या दहा दिवसांत निर्माण होणारे निर्माल्य या पिशवीत टाकून विसर्जनाच्या दिवशी ऊर्जा युवा प्रतिष्ठान निर्माल्य संकलन केंद्र किंवा मनपा निर्माल्य संकलन केंद्रांवर या पिशव्या जमा कराव्यात असे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष अजय बोरस्ते यांनी विद्यार्थ्यांना केले. मुख्याध्यापिका मीनाक्षी गायधनी यांनीही विद्यार्थ्यांना जलप्रदूषणापासून होणाऱ्या हानीची माहिती दिली. वैशाली देवरेही यावेळी उपस्थित होत्या. विद्यार्थ्यांनी शाडूमातीची मूर्ती बसविण्याचा संकल्प केला. सूत्रसंचालन प्रतिभा बोऱ्हाडे यांनी केले.