मोबाईलच्या वापरामुळे कर्करोग होतो की नाही, याविषयी संशोधकांमध्ये बरीच काथ्याकूट सुरू असली तरी चोवीस तासांत दोन तासांच्या वर मोबाईलचा वापर केल्यास कानाचे विकार वाढत असल्याचे शहरातील कानविकार तज्ज्ञांचे मत आहे. मोबाईलचा वापर आवश्यक तेव्हाच करावा, असा सल्लाही या डॉक्टरांनी दिला आहे. किरणोत्सार किंवा रेडिएशन म्हणजे अणूंनी बाहेर फेकलेली ऊर्जा होय. ही ऊर्जा सर्वसाधारणत: इलेक्ट्रोमॅग्नेटिक लहरींच्या स्वरूपात बाहेर टाकली जाते. कधीकधी ती अणूचे भाग असलेल्या कणांच्या स्वरूपातही बाहेर फेकली जाते. प्रकाश, उष्णता, रेडिओ लहरी किंवा मायक्रोवेव्ह (लघुलहरी) ही काही किरणोत्साराची उदाहरणे होय. परंतु अशा प्रकारचा किरणोत्सार मानवास हानीकारक नसतो. किरणोत्साराचे ‘आयोनायझिंग’ आणि ‘नॉन आयोनायझिंग’ हे दोन प्रकार आहेत. प्रकाश, उष्णता, मायक्रोवेव्ह या प्रकारचा किरणोत्सार हा नॉन आयोनाझिंग प्रकारात मोडतो. प्रकाशलहरी जेव्हा हवेतून अथवा काचेतून जातात, तेव्हा हवेच्या अथवा काचेच्या रेणूमधील बंधावर त्याचा काहीही परिणाम होत नाही. या प्रकारचा किरणोत्सार एखाद्या पदार्थातून गेला असता त्या पदार्थाचे रेणूबंध मोडले जातात, अथवा बदलले जातात अशा किरणोत्सराला ‘आयोनायझिंग रेडिएशन’ असे म्हणतात. आयोनायझिंग किरणोत्साराचा मारा मानवी पेशीवर अतिशय मोठय़ा प्रमाणात झाल्यास शरीरातील पेशी मरतात. मोबाईलमधून आयोनायझिंग किरणोत्सार होत असतो. चोवीस तासापैकी अनेक जण अधूनमधून बारा तासाच्यावर मोबाईल वापरतात. या काळात एक ते दीड तास मोबाईल वापरला तर त्याचे फारसे दुष्परिणाम होत नाही. परंतु दोन तासाच्या वर वापरल्यास त्यातून निघणाऱ्या किरणोत्सारामुळे कानाच्या पेशी मरतात. त्यामुळे बहिरेपणासारखा आजार बळावतो. तसेच कानावरती डोक्याचा भाग गरम झालेला आढळून येते. मोबाईलमधून निघणाऱ्या किरणोत्सराचा तो परिणाम असतो. डोकेदुखी, चक्कर येणे, कामात मन न लागणे, मळमळ वाटणे, हे मोबाईलमधून निघणाऱ्या किरणोत्सराचा परिणाम होय, असे मत कान-नाक-घसा तज्ज्ञ डॉ. नंदू कोलवाडकर यांनी व्यक्त केले. मोबाईलमुळे ब्रेन टय़ूमर अथवा मेंदूचा कर्करोग होण्याचे ठोस पुरावे मिळाले नसले तरी मोबाईल संच बनवणाऱ्या कंपन्या व सेवा देणाऱ्या कंपन्या या शक्यतेचा इन्कार करीत नाहीत. परंतु ब्लॅकबेरी व अॅपलसारख्या कंपन्या त्यांच्या मॅन्युअलमध्ये मोबाईलफोन वापरताना कानापासून दूर अंतरावर ठेवण्याचा सल्ला देतात. मोबाईल कानावर धरला असता त्यामुळे होणाऱ्या किरणोत्सारापैकी १.२५ व्ॉट प्रतिकिलोग्रॅम एवढा किरणोत्सार शरीरातील उतीत शोषला जातो. मोबाईल शरीरापासून दूर धरला की कमी किरणोत्सार शरीरात शोषला जातो, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.अधिक आवाज धोकादायक -डॉ. काळबांडेजेथे सतत आवाज होतात तेथे काम करणाऱ्या नागरिकांना आठ ते दहा वर्षांनंतर कानाने कमी ऐकू येते, हे सिद्ध झाले आहे. यामध्ये कारखाना, रेल्वे व लोखंडाचे काम करणाऱ्या ठिकाणचा समावेश आहे. कारण सततच्या आवाजाने अत्यंत संवेदनशील असलेल्या कानातील पेशी मरतात. हेच उदाहरण सतत दोन तासाच्या वर मोबाईलवर बोलणाऱ्यांना लागू होते. दोन तासाच्या वर मोबाईलवर बोलणाऱ्या आजच्या तरुण पिढीला त्याचे परिणाम हे पुढील आठ ते दहा वर्षांने जाणवायला लागणार आहेत. काही मुले नुसतेच कानाला एअरफोन लावून गाणे एकत असतात. एअरफोन लावून गाणे ऐकणे हे अत्यंत घातक आहे. आताच तरुण मुले कानाने कमी ऐकू येत असल्याचे सांगत आहेत. हे मोबाईलचेच दुष्परिणाम असल्याचे स्पष्ट झाले आहे. बहिरेपणाबद्दल संशोधन सुरू असले तरी त्याच्या खात्रीची टक्केवारी अजून बाहेर यायची आहे. त्यामुळे तरुणांनी मोबाईलचा वापर जपून करावा, बोलताना मोबाईल शक्यतो कानापासून दूर ठेवावा, असा सल्ला शहरातील ज्येष्ठ कान-नाक-घसा शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉ. विवेक काळबांडे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिला.