वाहन चालवताना मोबाईलवर बोलणे हा कायदेशीर गुन्हा, पण मोबाईलधारक वाहनचालक ही गुन्हेगारी बेमालुमपणे करतात. ही गुन्हेगारी करताना कधी जीव जातो, तर गुन्हेगारीची शिक्षा भोगताना खिसा रिकामा होतो. तरीही गुन्हेगारीचे हे सत्र मात्र अविरत सुरू आहे. अशाच या गुन्हेगारीवर ‘लोकसत्ता’ने प्रकाश टाकला तेव्हा प्रतिक्रियांचा पाऊस पडला.मोबाईलवर बोलत वाहन चालविण्याची जीवघेणी कला अनेकांनी अवगत केली आहे, पण ही कला स्वत:सोबत इतरांच्याही अंगलट येऊ शकते याचे भान बोलणाऱ्यांना नसते. बेदरकारपणे वाहन चालवत आणि मोबाईलवर बोलत वाहत्या रस्त्यांवरून त्यांचा हा प्रवास सुरू असतो. यात फक्त सामान्य नागरिक आणि युवकच आघाडीवर नाहीत तर कित्येकदा वाहतूक पोलीस आणि पोलीससुद्धा तीच चूक करतात. ज्यांना गुन्ह्यासाठी शिक्षा करण्याचे अधिकार आहेत, ते सुद्धा या गुन्हेगारीत सहभागी आहेत. त्यामुळे वाहन चालवताना मोबाईलवर बोलण्याच्या गुन्हेगारीला कसा अंकुश लावायचा, हा एक प्रश्न आहे.अलीकडच्या चारचाकी वाहनांमध्ये वाहन चालवतानासुद्धा मोबाईलवर सहजपणे बोलता येईल, अशी व्यवस्था आहे. मात्र, ही सुविधा आहे की पुन्हा तोच जीवघेणा प्रकार हे कळायला मार्ग नाही. तांत्रिक व्यवस्था कितीही चांगली असली तरी, मोबाईलवर बोलताना लक्ष विकेंद्रित होते. मेंदू एकाचवेळी दोन कामे करू शकत नाही, हे मानसशास्त्रज्ञांचेसुद्धा म्हणणे आहे. त्यामुळे ही सुविधा चांगली की वाईट हे अशा चारचाकी वाहनांचा वापर वाढल्यानंतर कळेल. तूर्तास तरी हा प्रकार दिवसेंदिवस धोकादायक ठरू लागला आहे. ही परिस्थिती एकटय़ा नागपूर शहराचीच नाही, तर इतरही सर्वच शहरांत हा प्रकार घडताना दिसून येतो. वाहन चालवताना मोबाईलवर बोलणे कायद्याने गुन्हा आहे आणि आर्थिक शिक्षेसह थेट परवाना रद्द करण्याची तरतूद आहे. मात्र, आर्थिक शिक्षेव्यतिरिक्त परवाना रद्द करण्याची शिक्षा फार कमी दिली जाते. दुचाकी वाहनचालक वाहतूक पोलिसांच्या जाळयात तरी सापडतात, पण चारचाकी वाहनधारकांना पकडणे कठीण असल्याचे खुद्द वाहतूक पोलिसांचेच म्हणणे आहे. दूरध्वनीनंतर आलेल्या मोबाईलमुळे अनेकांना त्यांची कामे सोपी वाटू लागली, पण हे साधेसोपे काम त्यांनी कधी आणि कसे कठीण केले हे त्यांनाही कळले नाही. त्यासाठी युवकांना दोष देऊन चालणार नाही, तर सर्वच स्तरातील आणि वयोगटातील लोक या गुन्हेगारीत सहभागी आहेत. त्यामुळे या संयुक्तिक गुन्हेगारीला आळा घालणेही आता त्यांच्याच हातात आहे.‘भन्नाट वाहने अन् कानाला मोबाईल..’ या मथळयाखाली ‘लोकसत्ता’ने या प्रकारावर प्रकाश टाकल्यानंतर अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या. नागरिकांनी त्यांचे अनुभव लोकसत्ता कार्यालयात किंवा ९५२७७०७१००, ९८२२४६७७१४, ९८२२७१९८१२ या क्रमांकावर तसेच व्हॉट्स अॅपवर किंवा nagpurlok@gmail.comया संकेतस्थळावर पाठवावेत. निवडक प्रतिक्रियांना वृत्तांतमध्ये प्रसिद्धी दिली जाईल.