जवळपास महिनाभरानंतर आलेल्या पहिल्याच संततधार पावसाने नागरिकांना आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला तरी शहरातील बहुतेक ठिकाणचे रस्ते उखडले तर काही ठिकाणी खड्डे पडले असून त्यात पाण्याचे डबके साचले आहे. शहरातील कुठल्या भागात पाणी साचले जाते याची कल्पना असताना महापालिका प्रशासनाने मात्र कुठलेच प्रयत्न केलेले दिसत नाही आणि त्याचा नाहक जनतेला पहिल्याच पावसात झाला.काही वर्षांपूर्वी नागपूर शहरातील रस्त्यांची स्थिती कशी होती आणि यंदा पावसाळ्याच्या प्रारंभी रस्त्यांची कसे झाले आहेत, याकडे पाहिले तर शतकोत्तर महोत्सव साजरा होत असताना उपराजधानीचा दर्जा देण्यात आलेल्या नागपूरची खरी ओळख ती हीच का? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांच्या मनात येत आहे. शहरातील अनेक ठिकाणी सिमेंटचे रस्ते तयार करण्यात आले असले शहरातील ८० टक्के भागात डांबरी रस्ते आहेत. पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची डागडुजी केली जाते. पावसाळ्यात मात्र हे रस्ते उखडले जातात. गेल्या आठवडय़ातील पावसाने अनेक खड्डय़ांमध्ये टाकण्यात आलेली माती आणि रस्त्यांवरील डांबर वाहून गेले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी खड्डे उघडे पडले आहेत. काही रस्त्यांवरून जाताना कच्च्या रस्त्यांप्रमाणे धूळ आणि माती साचलेली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि सार्वजानिक बांधकाम विभागाने आयआरडीपीतंर्गत करण्यात आलेल्या महामार्गावरची अवस्था फारच बिकट झाली आहे. मोक्षधाम स्मशानभूमीपासून अशोक चौक, भंडारा मार्ग, वर्धा मार्ग, कामठी मार्ग, काटोल मार्गावरील डांबरी रस्त्यांवर काही ठिकाणी खड्डे पडले आहेत. काही ठिकाणी रस्त्यांच्या मधोमध मोठे खड्डे पडले आहेत. या रस्त्यांवरून वाहने चालवताना नागपूरकरांना कसरत करावी लागत आहे. लोखंडी पुलाजवळ दरवर्षी मुसळधार पाऊस आल्यानंतर पाणी साचले जाते. तेथून गाडी काढणे नागरिकांना शक्य होत नाही. त्या भागात पाण्याचा निचरा होण्यासाठी कुठलीच व्यवस्था करण्यात आली नाही. या शिवाय शहरातील अनेक वस्त्यांमध्ये पाणी साचले दिसून आले. गटारे साफ केली नाही, मेन होल्सवर झाकणे नाहीत, अशा परिस्थितीमध्ये पाण्याचा निचरा न होता गटारातील पाणी रस्त्यावर आले. एकीकडे शहरातील विविध भागात पाणी साचण्याचे प्रकार उघडकीस आले असताना दुसरीकडे मात्र महापालिकेच्या सिव्हील लाईनमध्ये आणि अग्निशमन विभागाच्या कार्यालय परिसरात पाणी साचले होते. नागनदी, पिवळी नदी स्वच्छता करण्यात आली असली तरी अनेक ठिकाणी मोठय़ा प्रमाणात गाळ असल्याने पाण्याचा निचरा होत नव्हता. नेहमीप्रमाणे शहरातील अनेक अपार्टमेंटमध्ये पाणी शिरले होते मात्र त्यांना महापालिका प्रशासनातर्फे सूचना दिल्यानंतर कुठलीच व्यवस्था केली नाही. ऑरेंज सिटी वॉटर वर्क्सने शहरातील अनेक वस्त्यामध्ये जलवाहिनी टाकण्यासाठी खोदलेले खड्डे अजूनही बुजविलेले नाहीत. परिणामी नागरिकांना या खड्डय़ांमुळे चिखल, माती आणि घाणेरडे पाणी अंगावर झेलावे लागत असून लहान सहान अपघात नित्याची बाब झाली आहे. शहरातील अनधिकृत वस्त्त्यामधील रस्त्यांची अवस्था तर फारच वाईट आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांची अवस्था बघून आपण उपराजधानीत खरोखरीच राहत आहोत का? असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. रस्त्यांच्या दुर्दशेसाठी एकमेकांकडे बोट दाखण्याची प्रशासकीय अधिकाऱ्यांची वृत्ती शहरवासीयांना अधिक संताप आणत आहे.