‘रामायण’, ‘महाभारत’, ‘जय हनुमान’ आणि आता ‘देवों के देव महादेव’ सारख्या पौराणिक मालिकांनी नेहमीच टीव्हीच्या प्रेक्षकांवर गारूड केले आहे. पौराणिक मालिका लोकप्रिय होत असल्या तरी त्यांची निर्मिती हे एक मोठे आव्हान असते. या मालिकांसाठी लागणारे सेट्स, वेशभूषा-रंगभूषा या सगळ्याच गोष्टी आव्हानात्मक असल्याने मराठी वाहिन्यांवर पौराणिक मालिकांची निर्मिती झाली नव्हती. मात्र, निर्माता-दिग्दर्शक महेश कोठारे यांच्या किमयेतून झी मराठीवर पहिल्यांदाच जेजुरीच्या खंडोबाची पौराणिक कथा मालिके च्या रूपात पहायला मिळणार आहे. पौराणिक कथेवर मालिका करण्याची कल्पना ही माझा सहकारी संतोष अयाचित याची होती. संतोष अत्यंत कल्पक विचारांचा माणूस आहे. त्याचा खंडोबावरचा अभ्यास चांगला असल्याने त्यानेच मला हा विषय सुचवला, अशी माहिती महेश कोठारे यांनी ‘वृत्तान्त’शी बोलताना दिली. जेजुरीचा खंडोबा हा जनमानसात लोकप्रिय आहे ही गोष्ट आहेच. पण, त्याच्या कथेत एक नाटय़ आहे जे या मालिकेत रंगवता येऊ शकेल, हा विश्वास वाटल्यानेच ‘जय मल्हार’ची निर्मिती करण्याचा निर्णय घेतल्याचे महेश कोठारे यांनी सांगितले. मात्र, या मालिकेसाठी लागणारा सेट, कपडेपट, त्यांची शस्त्रे आणि व्हीएफएक्सचा वापर या सगळ्या गोष्टी लक्षात घेता ही अत्यंत खर्चिक निर्मिती होती. ‘झी मराठी’ने ही ‘जय मल्हार’ची संकल्पना उचलून धरल्याने आपल्याला पौराणिक मालिकेचे शिवधनुष्य पेलता आले, असेही ते पुढे म्हणाले. ‘जय मल्हार’साठी गोरेगावच्या चित्रनगरीत पावणेदोन एकर जागेवर भव्य सेट उभारण्यात आला आहे. या सेटवर एकीकडे जेजुरीतला खंडोबाचा महाल, दुसरीकडे त्याची पहिली पत्नी म्हाळसाचे घर म्हणजे तिचा वाडा आणि तिथेच डोंगरकडय़ाच्या बाजूने उभा राहिलेला धनगरपाडा जिथे खंडोबाची दुसरी पत्नी भानूची कथा घडते, अशा तीन-चार जागा बनवण्यात आल्या आहेत. हा सेट बनवण्यासाठी तीन महिने लागल्याची माहिती कोठारे यांनी दिली. गेले दीड वर्ष या मालिकेची तयारी सुरू होते. खंडोबाच्या कथेसाठी फलटणचे डॉ. ठोमरे यांची मदत घेण्यात आली आहे. ठोमरे यांनी खंडोबावर प्रबंध लिहिला आहे. त्यांच्या मदतीने संतोष अयाचित यांनी या मालिकेचे पटकथा लेखन केले असून वेशभूषा-केशभूषा ते मालिकेतील व्यक्तिरेखांची शस्त्रे ही सगळी जबाबदारी नीलिमा कोठारे आणि नीता खांडके यांच्या ‘एन क्रिएशन्स’ने उचलली आहे. ‘व्हीएफएक्स’ हा या मालिकेसाठी सर्वात महत्त्वाचा भाग होता. त्यासाठी आम्ही आमच्या तंत्रज्ञांची टीमच तयार केली. या मालिकेसाठीची तयारी सुरू असतानाच त्यांनी जेजूरीचा महाल आणि इतर गोष्टींचे सीजीआय (कॉम्प्युटर ग्राफिक्स)करून ठेवले होते. आता मालिकेचे चित्रिकरणही सुरू झाले असून लवकरच ही मालिका प्रेक्षकांसमोर येईल, असा विश्वास महेश कोठारे यांनी व्यक्त केला.