लाल रक्तपेशींच्या बदलणाऱ्या आकारामुळे होणारा ‘सिकलसेल’ आजार बळावला असून नाशिकसह राज्यात २० जिल्ह्य़ांमध्ये रुग्णांची संख्या वाढत आहे. या आजारामुळे रुग्णांची होणारी ओढाताण, त्यांच्यावर पडणारा आर्थिक ताण लक्षात घेऊन आरोग्य विभागाने सिकलसेल रुग्ण व त्यांच्या मदतनीसांसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या सहकार्याने मोफत प्रवासाची सेवा उपलब्ध करून दिली आहे. या रुग्णांना उपचार व तत्सम कारणांसाठी करावा लागणारा प्रवास आता मोफत राहील.सिकलसेल हा आनुवांशिक आजार असून माता-पित्यांकडून तो पुढील पिढीला होतो. त्यात वाहक आणि ग्रस्त असे दोन प्रकार आहेत. ग्रामीण विशेषत आदिवासी भागात सिकलसेल रुग्ण आढळतात. साधारणत २००९ पर्यंत या आजाराविषयी फारशी कोणाला माहिती नव्हती. केंद्र तसेच राज्य सरकारच्या राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान तसेच आरोग्य विभाग काही सामाजिक संस्था यांच्या पुढाकाराने या आजाराविषयी प्रबोधन सुरू झाले. सिकल म्हणजे विळा आणि सेल म्हणजे पेशी. लाल रक्तपेशींना विळ्यासारखा मिळणाऱ्या आकारामुळे त्यास सिकलसेल म्हणतात. यातून रक्तक्षयाची व्याधी बळावते, तसेच स्नायूंचे दुखणे यासह अशक्तपणा मोठय़ा प्रमाणावर जाणवतो. कधी कधी रुग्णांना हिमोग्लोबिन कमतरतेमुळे रक्त देण्याची वेळ येते. आरोग्य विभागाने या संदर्भातील चाचणी, औषधोपचार आणि रक्त संक्रमणाची व्यवस्था मोफत करून दिली आहे. नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणात चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, नांदेड, जळगाव, धुळे, नंदुरबार, औरंगाबाद, नाशिक, ठाणे, रायगड, हिंगोली, बुलढाणा, वाशीम, अकोला आणि पालघर जिल्ह्यांत सिकलसेल रुग्णांची संख्या मोठय़ा प्रमाणावर असल्याचे निदर्शनास आले.नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत सात लाख ३५ हजार रुग्णांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी दोन हजार २७८ वाहक आणि १२१ रुग्ण ग्रस्त आहेत. पेठ, सुरगाणा, त्र्यंबक या आदिवासी पट्टय़ात रुग्णांची संख्या अधिक आहे. रुग्ण औषधोपचार किंवा रक्त संक्रमणासाठी केवळ पैशांअभावी जिल्हा रुग्णालयात येत नाहीत. रुग्णांची अडचण लक्षात घेत आरोग्य विभागाने सिकलसेल रुग्ण व त्यांचा मदतनीस यांना बसने प्रवास मोफत केला आहे. या योजनेला रुग्णांकडून प्रतिसाद लाभेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.आता रुग्ण रुग्णालयात येतीलजिल्हा रुग्णालयासह सर्व ठिकाणी सिकलसेल रुग्णांसाठी औषधोपचार व रक्तसंक्रमणाची व्यवस्था सरकारने मोफत केली आहे. मात्र त्या ठिकाणी येण्या-जाण्याचा खर्च हा प्रत्येकाला परवडेल असे नाही. राज्य सरकारच्या निर्णयाने असे रुग्ण दवाखान्यात येतील, वेळेवर औषधोपचार तसेच रक्तसंक्रमण पूर्ण करतील. त्यांचे आयुष्यमान वाढण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे. - रोहिणी नायडू (गौरी सामाजिक कल्याणकारी संस्था)