नगरसेवक, महापौर, आमदार व आता राज्याचे मुख्यमंत्री असा विलक्षण प्रवास वयाच्या ४४ व्या वर्षी पूर्ण करणारे अस्सल नागपूरकर देवेंद्र फडणवीस आज राज्याची सूत्रे हाती घेत आहेत. त्यांच्या या पदग्रहणाच्या निमित्ताने शहरातील समस्या व नागरिकांच्या अपेक्षांचा घेतलेला हा धांडोळा..निष्क्रिय पोलीस यंत्रणेमुळे शहरात वाढत चाललेली गुंडगिरी, ढेपाळलेली कायदा व सुव्यवस्था जागेवर आणण्याचे मोठे काम नव्या सरकारला करावे लागणार आहे. गुन्हेगारीच्या या चढत्या आलेखामुळे भयभीत असलेल्या सामान्य नागरिकांना एक नागपूरकर या नात्याने नवे मुख्यमंत्री दिलासा देणार का? हाच प्रश्न सध्या सर्वाच्या तोंडावर आहे. भूखंड माफिया, देश तसेच विदेश पातळीवर संबंध ठेवून असणारे बुकी व त्यांनी पोसलेले सराईत गुंड यांचा धुमाकूळ सध्या शहरात रोज सुरू असतो. मुंबईसह राज्यातील अनेक शहरात गँगवार संपुष्टात आहे, पण या शहरात ते जोमाने सुरू आहे. शस्त्रांच्या बळावर अपहरण, हत्या घडवून आणणाऱ्या या गुंडांमुळे या शहराची कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. आयुक्त के.के. पाठक व त्यांचंी संपूर्ण पोलीस यंत्रणा कमालीची निष्क्रीय झाल्याने गुंडांचे फावले आहे तर सामान्य माणसांचा जीव टांगणीला लागला आहे. येथील गुंडगिरीला राजकीय वरदहस्त लाभला आहे. या वरदहस्ताचे स्वरूप सर्वपक्षीय आहे. भाजपचे आमदार डॉ. मिलींद मानेंच्या विजयी मिरवणुकीत कुख्यात गुंड संतोष आंबेकर सहभागी होणे, आणखी एक गुंड धावडे भाजपचा नगरसेवक असणे ही या वरदहस्ताची काही उदाहरणे आहेत. या शहरात बुकींचे साम्राज्य मोठे आहे. एकटय़ा पाचपावली, जरीपटका भागात साडेतीनशे बुकी आहेत. याशिवाय प्रत्येक वार्डात जुगाराचे अड्डे चालवणारे वेगळेच. या सर्वाकडून वारंवार हिंसक कारवाया होऊनसुद्धा पोलीस शांत बसतात. त्याचे एकमेव कारण राजकीय दबाव आहे. मध्यंतरी चारशे महिलांचा जथ्था नितीन गडकरींच्या वाडय़ावर चालून गेला होता. गुंडगिरी संपवा अशीच या महिलांची मागणी होती. गुंडगिरी व त्यातला राजकीय हस्तक्षेप नवे मुख्यमंत्री मोडून काढतील का, असा प्रश्न सध्या तमाम नागपूरकरांना पडला आहे. गुंडगिरीच्या राजकारणापासून आजवर स्वत:ला अलिप्त ठेवणाऱ्या देवेंद्र फडणवीसांनाही या साफसफाईची सुरुवात स्वत:च्याच पक्षापासून करावी लागणार आहे.देवेंद्रशी स्पर्धा नाही - गडकरीअखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्तापासून ते आता मुख्यमंत्रीपर्यंतच्या प्रवासापर्यंत देवेंद्रने अतिशय निष्ठेने आणि प्रामाणिकपणे काम केले. आता त्याचे नेतृत्व यापुढे राज्याच्या विकासाला चालना तसेच नवीन दृष्टी देणारे राहील. राजकारणात उत्कृष्ट वक्ता, अभ्यासू आणि स्वच्छ प्रतिमा असल्यामुळे राज्याचा विकास करताना त्याला फारशा अडचणी येतील, असे वाटत नाही. विदर्भाचा महत्त्वाकांक्षी असलेला मिहान प्रकल्प रखडला असून या प्रकल्पासह अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. देवेंद्रला मिहानचा अभ्यास आहे त्यामुळे त्याला योग्य न्याय देऊन त्याच्या कार्यकाळात हा प्रकल्प वेगळ्या उंचीवर जाईल यात शंका नाही. त्यासाठी त्याला केंद्र सरकारकडून जे काही सहकार्य लागणार आहे, ते केले जाणार आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल कुणाचीही नाराजी नाही आणि स्पर्धा नाही.