बटव्यातून गुपचूप खडीसाखर तळहातावर ठेवणारी आजी घराघरातून हरवत चालली असून मुलांना नात्यांची ओळख करून देणारे आजी-आजोबा कुटुंबात राहिले नाहीत. आजी-आजोबा हे संस्काराचे विद्यापीठ आहे, असे प्रतिपादन प्रा. छाया लोखंडे-गिरी यांनी केले. शहरातील सावरकरनगरमध्ये स्वानंद हास्य क्लबतर्फे १५ व्या वर्धापन दिनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ‘आजच्या कुटुंब संस्थेचा कणा-आजीआजोबा’ या विषयावर त्या बोलत होत्या.आपल्या घरातील सासु-सुनेचे नाते हे प्रेमाचे, जिव्हाळ्याचे असायला हवे. आजी-आजोबांनीही सध्याच्या जीवनशैलीशी मिळते-जुळते वागले पाहिजे. संगीत, नाटक, प्रवास वाचन, सामाजिक कार्य असे छंद जोपासले पाहिजेत. हास्य हे संसर्गजन्य आहे. आपण हसलो तर इतर हसतील. हसण्यामुळे मनातील भीती आणि काळजी दूर पळते, असेही प्रा. छाया लोखंडे-गिरी यांनी सांगितले. या प्रसंगी आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये महिलांनी वासुदेव, मुक्ताबाई, जनाबाई, मीराबाई, कान्होपात्रा यांच्या भूमिका सादर केल्या. विविध स्पर्धामध्ये यश संपादन केलेल्या महिलांचा गौरव प्रा. लोखंडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी क्लबच्या संस्थापिका मंजिरी वैद्य, अध्यक्षा जयश्री दामले उपस्थित होत्या. प्रास्तविक माधवी बिवलकर यांनी केले. सूत्रसंचालन वीणा शिरभाते यांनी केले. आभार छाया खैरनार यांनी मानले.