दिवाळी हा वर्षांतील सगळ्यात चांगला काळ. चांगले घडण्याची, चांगले करण्याची, शुभ चिंतण्याची ही वेळ. दिवाळीच्या या शुभ मुहूर्तावर मुंबईकरांसाठी काही चांगल्या बातम्या आहेत. मुंबईत एकाचवेळी जरूरीपेक्षा अधिक पाणी मिळते तर त्याचवेळी अनेकजण तहानेने व्याकुळलेले असतात. ही असमानता दूर करून सगळ्यांना सारखे पाणी मिळण्याची प्रक्रिया येत्या काही दिवसांत सुरू होत आहे. तर सर्वसामान्यांना परवडणारी म्हाडाची तब्बल ३० ते ४० हजार घरे लवकरच तयार होण्याची शक्यता असून लाखो लोकांचे गृहस्वप्न त्यामुळे साकारणार आहे. पण त्याहीपूर्वी मुंबई आणि परिसरात सध्या तयार असूनही ग्राहकांअभावी रिकामीच राहिलेली सुमारे १ लाख घरे लवकर विकली जावीत, यासाठी बिल्डरांनी दिवाळीचा मुहूर्त साधून भरघोस सवलती देऊ केल्या आहेत. आगामी वर्षांत तरी काही चांगले घडेल, असा दिलासा देणाऱ्याच या वार्ता..