नवी मुंबई, वाशी या ठिकाणी जाऊ इच्छिणाऱ्या पश्चिम उपनगरवासीयांच्या सोयीसाठी हार्बर रेल्वे मार्ग गोरेगावपर्यंत विस्तारण्याचे काम जोमाने सुरू असले तरी हे स्थानक आणि त्याला लागून असलेल्या ‘बंडू गोरे मार्गा’वर प्रवाशांच्या गर्दीचा जो काही ताण भविष्यात येणार आहे त्याचे नियोजन करण्याच्या दृष्टीने मुंबई महानगरपालिकेच्या आघाडीवर मात्र सामसूम आहे. कारण, या अत्यंत चिंचोळ्या अशा मार्गाच्या विस्तारीकरणाची योजना पालिकेच्या २०१२ ते २०३४ पर्यंतच्या विकास आराखडय़ात प्रस्तावित आहे. त्यामुळे, सरकारदरबारी प्रलंबित असलेला हा आराखडा जोपर्यंत मंजूर होत नाही तोपर्यंत या मार्गाच्या विस्तारीकरणाचे घोडेही अडलेले राहणार आहे आणि त्याचा त्रास येथील प्रवाशांना सोसावा लागणार आहे.

गोरेगावपर्यंतच्या हार्बर मार्गाच्या विस्तारीकरणाचे काम जोरदारपणे सुरू आहे. गोरेगाव ते सीएसटी, पनवेलमार्गे जाणाऱ्या गाडय़ा गोरेगाव स्थानकावरून सुटणार असल्याने या स्थानकाचा कायापालट होणार आहे. स्थानकाच्या विस्तारीकरणाचे काम पूर्ण होत आले असून हा मार्ग कधीही सुरू होईल. परंतु, गोरेगावच्या नव्या हार्बर स्थानकाला लागून असलेला बंडू गोरे मार्ग कमालीचा अरूंद आहे. हा मार्ग थेट स्वामी विवेकानंद मार्गाला येऊन मिळतो. गोरेगाव पश्चिम येथील स्थानकाला जोडणारे आरे आणि सुरभी हॉटेल येथून येणारा आणखी एक असे दोन मार्ग एकेरी आहेत. परंतु, बंडू गोरे मार्गाचे तसे नाही. दुहेरी वाहतूक असलेल्या हा एकमेव मार्ग प्रवाशांच्याही सोयीचा आहे. त्यामुळे, त्याचे विस्तारीकरण हे काळाची गरज आहे. ‘भविष्यात वाढणाऱ्या प्रवाशांच्या व वाहतुकीच्या रहदारीचा ताण या चिंचोळ्या मार्गावर येणार असल्याने स्थानक सुरू होण्याआधी या मार्गाचा विस्तार होणे आवश्यक आहे. अन्यथा त्याचा त्रास अपरिहार्यपणे प्रवाशांना सहन करावा लागणार आहे,’ अशी तक्रार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी तालुका अध्यक्ष सचिन चव्हाण यांनी केली.
‘या मार्गाचे विस्तारीकरण करणे आवश्यक आहे. तशी योजनाही पालिकेने आखली आहे. मात्र, त्यात या रस्त्यावरील ५० ते ६० दुकानांचा अडसर आहे. या दुकानांना पर्यायी जागा किंवा आर्थिक मोबदला देऊन त्यांना येथून हलविण्यात येणार आहे. मात्र, या मार्गाच्या विस्तारीकरणाची योजना प्रस्तावित विकास आरखडय़ात नमूद केली आहे. या आराखडय़ाला मंजुरी मिळाल्यानंतर आम्ही या मार्गावरून दुकानांना हलविण्याचे काम सुरू करू. सध्या आम्ही येथे केवळ काँक्रिटीकरण करतो आहोत,’ अशी माहिती पालिकेच्या ‘पी-दक्षिण’ विभागाचे अधिकारी रमाकांत बिरादार यांनी दिली. म्हणजे जोपर्यंत डीपी मंजूर होत नाही तोपर्यंत या मार्गाच्या विकासाचे अडलेले घोडे कायम राहणार आहे.
दरम्यान या मार्गावरील दुकानदारांना स्थानकाला लागून असलेल्या मंडईत हलविण्यात यावे, अशी मागणी चव्हाण यांनी केली आहे. हे दुकानदार ग्रामपंचायतीच्या काळापासून येथे आहेत. त्यामुळे, त्यांना मंडईत गाळे देण्यात यावे. जेणेकरून रस्त्याच्या विस्तारीकरणाचे काम लवकरात लवकर पूर्ण होईल, अशी मागणी त्यांनी केली.
रेश्मा शिवडेकर, मुंबई</strong>