पाऊस कमी पडो किंवा जास्त, पेट्रोलचे दर वाढो अथवा.. मंडईतील भाज्यांचे भाव वाढण्यामागे कोणतेही कारण पुरेसे पडते. त्यात मापात फसवणूक, कचरा, अस्वच्छता, तावातावाने भांडणाऱ्या भाजीवाल्या ही सर्व अडथळ्यांची शर्यत पार करून यशस्वीरीत्या भाजी खरेदी केलीच, तरी घरी नेईपर्यंत त्याच्या ओझ्याने पूर्णपणे दबायला होते. गेल्या काही वर्षांमध्ये घरच्या घरी शेती करण्यास लोकांनी सुरुवात केली आहे. आपल्याकडे भाज्या, फळे यांची देठे, सुकलेली पाने, साली यांसारख्या विघटनशील कचऱ्याचा वापर करून, कमीत क मी पाण्याचा उपयोग आणि मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेला सूर्यप्रकाश यांच्या साहाय्याने माफक खर्चात घरच्या घरी भाजीपाला आणि फळे पिकविता येऊ शकतात, असे मराठी विज्ञान परिषदेत शहरशेतीबद्दल मार्गदर्शन करणारे दिलीप हेरलेकर सांगतात. शेतीमध्ये होणारा वाढता रासायनिक खते, कीटकनाशके यांचा वापर, भाजीपाला हाताळताना अपुऱ्या स्वच्छतेचा अभाव या समस्या आपल्याला दैनंदिन भाजीपाल्याच्या बाबतीत भेडसावतात. त्याऐवजी इमारतीच्या गच्चीत किंवा गॅलरीमध्ये आपल्या देखरेखीत पिकविलेल्या सेंद्रिय भाजीपाल्यामध्ये पुरेशी पोषणमूल्ये असतात. हा भाजीपाला पिकविण्यासाठी चांगल्या प्रतीच्या बियाणांखेरीज इतर कोणताही फारसा खर्चही येत नाही. तसेच भाजी पिकण्यासाठी ३ते४ महिन्यांचा कालावधी आणि फळांसाठी कलम वापरल्यास एखाद्या वर्षांचा कालावधी सहज पुरेसा असतो. त्यामुळे ॠतूनुसार भाजीपाला मिळविणे शक्य होते. त्यात घरात मुले असल्यास त्यांच्यासाठी हा घरी पिकणारा भाजीपाला एक कुतूहलाचा विषय असतो, असेही ते नमूद करतात. एका रोपामधून सहजपणे दीड ते दोन किलो भाजी मिळते. त्यामुळे सहा भाज्या, दोन फळे आणि फुलांची झाडे इतके एका घरासाठी पुरेसे असते. तसेच घरी ॠतूनुसार येणाऱ्या सर्व भाज्या लावता येतात. पावसाळा आणि उन्हाळ्यात भेंडी, गवार, दोडकी, कारली, पडवळ या भाज्या तर हिवाळ्यात फ्लॉवर, कोबी पिकवता येतो. वांगी, टोमॅटो, मिरच्या या भाज्या बारा महिने घेता येतात.लागवडीची पूर्वतयारी* भाजीच्या लागवडीसाठी कुंडय़ांऐवजी कमी वजनाच्या प्लॅस्टिक पिशव्या, रिकाम्या प्लॅस्टिकचे डबे वापरणे हाताळण्याच्या दृष्टीने सोयीचे असते. तसेच डब्यांच्या खालच्या बाजूने आवश्यक प्रमाणात छिद्रे केल्यास अतिरिक्त पाणी सहज निथळून जाऊ शकते. * डब्यामध्ये मातीचे थर करताना पहिल्यांदा एकतृतीयांश तंतूमय पदार्थ, त्यानंतर सुकी पानं आणि सर्वात शेवटचा स्थानिक मातीचा असे तीन थर करावेत. डब्याच्या २५ टक्के आकारमानाइतके पाणी रोपटय़ांना पुरेसे असते. संध्याकाळी पाणी दिल्यास बाष्पीभवनाने पाणी उडून जाणे टळते. * या भाज्यांसाठी घरातील सुकी पाने, भाज्यांची देठे, साली यांचा वापर खत म्हणून करता येतो. त्यांच्यामुळे मातीची पोषणमूल्ये वाढतात. * भाज्यांसाठी उत्तम प्रतीची बियाणे घेणे गरजेचे असते. त्यामुळे बाजारात उपलब्ध बियाणांचा वापर करावा.* भाजीपाल्याचे कीटक, किडे आणि पक्ष्यांपासून संरक्षण करणे महत्त्वाचे असते. हिरव्या मिरचीच्या पाण्याच्या फवारणीने कीटकांचा प्रादुर्भाव कमी होतो. तंबाखूचे पाणीसुद्धा कीटकनाशक म्हणून वापरता येते. पण तंबाखूच्या पाण्याची फवारणी केल्यावर चार दिवसांनंतर भाजी वापरावी. बुरशीसाठी कडूलिंबाच्या अर्काचे पाणी वापरले जाते. * भाज्यांमध्ये नत्रासाठी मेथीचा तर फॉस्फरसची कमतरता असल्यास कोबी, फ्लॉवर यांच्या देठांचा खत म्हणून वापर करावा. कित्येकदा पोटॅशिअमच्या अभावाने पाने गंजल्यासारखी दिसतात अशा वेळी केळी, पपईची पाने वापरावीत.