भारतातील पहिली राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्था कामठीत स्थापन केली जाणार आहे. संस्थेच्या उभारणीसाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने ६१ हेक्टरची जागा आणि १९० कोटी रुपयांच्या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे, अशी माहिती राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली. संस्थेमध्ये जागतिक दर्जाच्या सुविधा राहणार असून राष्ट्रीय व्यवस्थापन निवारण दलाच्या जवानांना अत्याधुनिक दर्जाचे प्रशिक्षण देण्याची सोय राहील, असे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष एम. शशीधर रेड्डी यांनी सांगितले. या ठिकाणी केंद्रीय तसेच राज्याची आपत्ती व्यवस्थापन दले आणि विदेशातील पथकांनाही प्रशिक्षण दिले जाणार आहे.संस्थेचा परिसर ६१ एकर जागेवर पसरलेला राहणार असून निसर्ग निर्मित आणि मानव निर्मित संकटाच्या प्रसंगी मानवी जीवन वाचविण्याची प्रात्यक्षिके केली जातील. यातूनच पथकातील जवानांचे प्रशिक्षण होणार आहे. आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण अत्यंत वेगळे आहे. कामठीतील संस्था देशभरातील प्रमुख संस्था म्हणून भूमिका बजावणार असून खचलेल्या इमारती, रासायनिक, जैविक आणि किरणोत्सर्गी हल्ले तसेच अणुहल्ल्यांच्या वेळी नागरिकांच्या जीविताचे रक्षण करण्याच्या दृष्टीने पथकांना प्रशिक्षित केले जाईल.नागपूर शहर देशाच्या मध्यवर्ती भागात वसलेले असून राष्ट्रीय नागरी संरक्षण महाविद्यालय आणि राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय नागपुरात आहे. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देणारे शहर म्हणूनही नागपूर देशात नाव कमावेल, असा विश्वास रेड्डी यांनी व्यक्त केला. दक्षिण-पूर्व आशियातील देशांमध्ये भारतात उत्कृष्ट दर्जाचे आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण दिले जात असल्याने विदेशातील संस्थांनाही नागपुरातील केंद्रात प्रशिक्षण घेण्यात स्वारस्य आहे. नैसर्गिक संकटांच्या अलीकडच्या काळात घडलेल्या घटना पाहता आपत्ती व्यवस्थापनाचे महत्त्व खूपच वाढले आहे. केंद्राचा आराखडा तयार करण्यापूर्वी युरोप आणि अमेरिकेतील आपत्ती व्यवस्थापन संस्थांचे मॉडेल अभ्यासले जाणार आहे. संस्थेचा प्रमुख म्हणून महानिरीक्षक दर्जाचा अधिकारी काम पाहणार आहे, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.