कायदा सर्वाना समान असतो आणि प्रत्येकाला समान वागणूक मिळायला हवी, अशी अपेक्षा असते. पण नुकत्याच घडलेल्या तीन घटनामंधील आरोपीतांना पोलिसांकडून वेगळ्या प्रकारची वागणूक दिल्याचे पाहायला मिळाले. आरोपी प्रतिष्ठित आणि वजनदार व्यक्ती असल्यामुळेच त्यांना झुकते माप दिल्याचे दिसून येत आहे. शिवसेनेचे आमदार विनोद घोसाळकर, आमदार बाळा सावंत आणि उद्योगपती नेस वाडिया ही त्यापैकीच तीन नावे. तिघांवर वेगवेगळ्या प्रकरणात गुन्हे दाखल असले तरी त्यांच्यावर तातडीने कारवाई झाली नाही.वांद्रे येथे राहणाऱ्या संध्या तेंडुलकर या पुनर्विकास प्रकल्पासंदर्भातील ‘जनहित असोसिएशन’ च्या सदस्य आहेत. त्यांनी त्यांच्या परिसरातील पुनर्विकास प्रकल्पाला विरोध केला आहे. त्यामुळे शिवसेनेचे स्थानिक आमदार बाळा सावंत यांच्याशी त्यांचा वाद आहे. बाळा सावंत यांनी त्यांच्या पतीला याबाबत घरी जाऊन धमकावले होते. ‘तुझ्या बायकोला समजव, नाहीतर भर रस्त्यात साडी उतरवेन’ अशी धमकी त्यांनी दिली होती. त्यापाठोपाठ ३० जून रोजी संध्या तेंडुलकर यांना भर रस्त्यात गाठून सावंक यांनी ‘कपडे काढून मारण्याची’ धमकी दिली होती. भर रस्त्यात एका आमदाराने अश्लील आणि अर्वाच्य शिवीगाळ केली होती. त्याविरोधात पेडणेकर यांनी खेरवाडी पोलीस ठाण्यात धाव घेतली. मात्र पोलिसांनी केवळ ५०४, ५०९ आणि ५१२ अशी किरकोळ कलमे लावून गुन्हा दाखल केला. न्याय मागण्यासाठी पेडणेतक पोलीस आयुक्तांपासून महिला आयोगापर्यंत गेल्या. पण आमदारांवर कुठलीच कारवाई झाली नाही. ‘एका महिलेला एक आमदार गुंडगिरीची भाषा करून धमकावतो आणि त्याला काहीच होत नाही ही दुदैवी बाब आहे. सर्वसामान्य नागरिकाने असे केले असते तर पोलिसांनी त्याला सोडले असते का,’ असा सवाल तेंडुलकर यांनी केला आहे. हा प्रश्न व्यक्तीचा नाही, तर प्रवृत्तीचा आहे. मी विनयभंगाची खोटी तक्रार केलेली नाही. पण तरी कारवाई झाली नाही, अशी त्यांची खंत आहे. विनोद घोसाळकरांना काही झाले का, असा शहाजोग सल्ला वजा प्रश्नही आमदाराने मला दिला, अशी माहितीही त्यांनी दिली. बाळा सावंत मात्र आपल्यावरील आरोप खोटे असल्याचे सांगत आहेत. शिवसेनेच्या नगरसेविका शीतल म्हात्रे यांना तर त्यांच्या पक्षाचेच आमदार विनोद घोसाळकर त्रास देत होते. ते प्रकरण खूप गाजले. पोलिसांकडे खेटे घालूनही त्यांना न्याय मिळाला नाही. माध्यमात हे प्रकरण बरेच गाजले. महापालिकेच्या, सभागृहात गदारोळ झाला तेव्हा कुठे घोसाळकर यांच्यावर ३५४ अन्वये गुन्हा दाखल झाला. पण अटक मात्र झाली नाही. परिणामी त्यांना अटकपूर्व जामीन घेता आला, असा आरोप म्हात्रे यांनी केला. या प्रकरणाची पुढची सुनावणी आता ८ महिन्यांनी होणार आहे. मी एवढा आवाज उठवून काय फरक पडला? घोसाळकरांची दादागिरी सुरूच आहे. त्यांना आता विधानसभेचे तिकीटही मिळेल. आता ८ महिन्यानंतर मी न्यायालयात जाऊन काय ती जुनी घटना पुन्हा सांगू? त्याची काय तीव्रता राहणार? अशी उद्वीग्न भावना त्यांनी व्यक्त केली. आरोपी केवळ एक आमदार आहे म्हणून हा बचाव होतोय का असा सवालही त्यांनी हताशपणे व्यक्त केला.अत्रिनेत्री प्रिती झिंटाने माजी प्रियकर नेस वाडियाच्या विरोधात तक्रार दिल्यानंतर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. पण अद्याप पोलिसांनी त्याला अटक केली नाही. सुरुवातीला पोलीस सांगत होते, प्रितीचा जबाब अस्पष्ट आहे. ती आल्यावर पुन्हा जबाब घेऊ आणि मग कारवाई करू. परदेशातून प्रिती आली. दोनदा तिने पोलिसांना भेटून सविस्तर जबाब दिला. प्रत्यक्षदर्शीची नावे दिली. पुरावे म्हणून मारहाणीची छायाचित्रे दिली. पोलीस मात्र स्टेडियममधील सीसीटीव्हीचे छायाचित्रण शोधत बसले आहेत. कहर म्हणजे नेसने त्याच्याकडील काही माणसांची नावे प्रत्यक्षदर्शी म्हणून दिली. यांचा पण जबाब घ्या, अशी मागणी त्याने केली. नेसला अटक करायची सोडून पोलीस त्याच्या माणसांचा जबाब सध्या घेत आहेत. सर्वसामान्य माणूस असता तर पोलिसांनी आधी अटक केली असती आणि नंतर पुढचा तपास केला असता. नेस उद्योगपती असल्याने त्याला मात्र वेगळा न्याय लावण्यात आला असावा.पोलीस सर्वसामान्यांची बाजू या ‘महानुभावां’प्रमाणे बाजू ऐकून घेतील का, असा सवाल आता उपस्थित होत आहे. कायद्यात आरोपीची बाजू ऐकून घेण्याची तरतूद आहे आणि आम्ही प्रत्येक प्रकरणात कायदेशीर बाबी पडताळून कारवाई करतो, असा दावा परिमंडळ १ चे उपायुक्त रवींद्र शिसवे यांनी केला. पण सर्वसामान्यांना कायद्याचा काय अनुभव येतो हे जगजाहीर आहे. प्रिती िझटाच्या प्रकरणाला वैयक्तिक पाश्र्वभूमी असली तरी विनयभंगाचा गुन्हा दाखल झालेला आहे. शीतल म्हात्रे आणि संध्या तेंडुलकर या नगरसेविका आणि उच्चशिक्षित आहेत. पण त्यांनाही आपल्यावरील अन्यायासाठी लढावे लागत आहे. सर्वसामान्यांच्या बाबतीत अशाच पद्धतीने पोलीस वागतील का हा त्यांचा सवाल पोलीस कसे दुजाभाव देतात ते स्पष्ट करतो.