आरोग्य, शिक्षण आणि पाण्याची सोय
ठाणे जिल्ह्य़ातील दुर्गम प्रदेशात मोडणाऱ्या तलासरी तालुक्यात गेल्या अडीच वर्षांपासून शेती प्रकल्पाच्या निमित्ताने कार्यरत ‘इस्कॉन’ या आंतरराष्ट्रीय धार्मिक संघटनेने गेल्या काही महिन्यांपासून स्थानिक ग्रामस्थांच्या विकासासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू केले असून त्यासाठी आय.ए.वेदिक या संस्थेमार्फत शिक्षण, आरोग्य आणि पाणी पुरवठय़ाचे प्रकल्प हाती घेतले आहेत.
तलासरी तालुक्यातील ३५ एकर जागेत इस्कॉनचा शेती प्रकल्प आहे. या प्रकल्पात पिकविलेला भाजीपाला, फुले आणि दूध मुंबईतील जुहूस्थित मंदिरात आणले जाते. तलासरीत पावसाळ्याव्यतिरिक्त इतर काळात पाण्याचे दुर्भिक्ष्य असल्याने ‘इस्कॉन’चा हा शेतीप्रकल्प अडचणीत आला होता. मात्र मुंबईतील जलवर्धिनी प्रतिष्ठानचे उल्हास परांजपे यांच्या सूचनेनुसार खोदण्यात आलेल्या कृत्रिम तळ्यात पावसाळ्यात दीड कोटी लिटर्स पाणी साठत असल्याने येथील पिकांना संजीवनी मिळाली. त्याचबरोबर त्यामुळे भुपृष्ठाची पातळी वाढून परिसरातील कुपनलिका व विहिरींचीही पाण्याची पातळी वाढली. त्यामुळे त्यापासून धडा घेत इस्कॉनच्या वतीने आता तलासरीतील सर्व ४२ गावांमध्ये प्रत्येकी १४०० लिटर्सची किमान एक पर्जन्य जल साठवण टाकी जलवर्धिनी प्रतिष्ठानच्या सहकार्याने बांधण्यात येत आहे. त्यातील पाच टाक्या बांधून झाल्या आहेत.

सहा गावांना
एक प्रशिक्षित सेवक
तालुक्यातील सर्वच गावांमध्ये शिक्षण, आरोग्य, रोजगार निर्मिती अशा स्वरूपाची ग्राम विकासाची योजना इस्कॉनतर्फे राबविण्यात येत असून त्यासाठी प्रत्येकी सहा गावांसाठी एक प्रशिक्षित समाजसेवक (एमएसडब्ल्यू) नेमण्यात येत असल्याची माहिती इस्कॉनच्या तलासरी प्रकल्पाचे प्रमुख दामोदर प्रभू यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली. हे समाजसेवक त्यांना नेमून दिलेल्या गावांमध्ये फिरून तेथील लोकांच्या गरजा समजून घेत आहेत. सध्या तालुक्यात ठिकठिकाणी नियमित आरोग्य शिबिरे भरविण्यात येत आहेत. तसेच शासनाने परवानगी दिली तर तलासरी तसेच डहाणू या दोन्ही तालुक्यांतील शाळांमधील सर्व शाळांमधील मुलांना पोषण आहार पुरविण्यास ‘इस्कॉन’ तयार आहे, असेही त्यांनी सांगितले. ‘इस्कॉन’च्या शेती प्रकल्पात एक  गोशाळाही असून त्यात सध्या शंभर गायी आहेत. ‘स्लॉस्टरहाऊस टु शेल्टरहाऊस’ किंवा ‘हाय वे टु हॅपी वे’ स्वरूपाच्या या गोशाळेतील निम्म्या गायी भाकड तर निम्म्या दुभत्या आहेत.