कामोठे ते तुर्भे या मार्गावर इकोव्हॅनने प्रवासी वाहतूक करणाऱ्या चालकांच्या विरोधात स्थानिक तीन आसनी रिक्षाचालकांनी एल्गार पुकारला आहे. खारघरचे रिक्षाचालकाला इकोव्हॅन चालकाने मारहाण केल्याने त्यांच्यातील वाद उफाळून आला आहे. गुरुवारी सायंकाळी दीपक घरत या इकोव्हॅनचालकांना एमजीएम रुग्णालयासमोरील रिक्षाचालकांनी मिळून मारहाण करून आपला राग व्यक्त केला. विशेष म्हणजे घरत धानसर गावातील स्थानिक असूनही त्यांना कामोठे येथे व्यवसाय करायला मज्जाव केला जात आहे. कळंबोलीपासून १० किलोमीटर अंतरावर धानसर हे गाव असल्याने ते स्थानिक नसल्याचा अजब दावा कामोठे व खारघर येथील रिक्षाचालकांनी केला आहे. याबाबत कामोठे पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दीपक हे पनवेल तालुक्यातील धानसर गावचे आहेत. मात्र त्यांनी धानसर परिसरातच व्यवसाय करावा त्यांनी कळंबोली, कामोठे व खारघर येथे व्यवसाय करू नये असा अलिखित फतवा त्यांना त्यांच्याच स्थानिक तीन आसनी रिक्षाचालकांनी सुनावला आहे. घरत यांना जिवे मारण्याची धमकी या रिक्षाचालकांनी दिल्याचे त्यांनी पोलीस तक्रारीत नोंदविले आहे. हा संपूर्ण वाद इकोव्हॅनचालक कामोठे व खारघर येथील रिक्षाचालकांची भाडे पळवतात म्हणून झाल्याचा पोलिसांचा संशय आहे. घरत यांच्या मारहाणीनंतर संबंधित रिक्षाचालकांना पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले. यामुळे कामोठे, नौपाडा येथील रिक्षाचालकांनी काही तासांसाठी रिक्षा सेवा बंद ठेवली होती. पोलिसांनी मारहाण करणाऱ्या रिक्षाचालकांची चौकशी करण्याअगोदर पोट भरणाऱ्या या दोनही गटांमध्ये (इकोव्हॅनचालक व रिक्षाचालक) यांच्यात समेट घडला. मात्र दहा किलोमीटरवर घरत यांचे गाव असल्याने त्यांनी येथे व्यवसाय करू नये अशी भूमिका रिक्षा चालकांनी घेतली आहे. विशेष म्हणजे कामोठे, नौपाडा, कोपरा, खारघर, बेलपाडा यांच्या व्यतिरिक्त इतर स्थानिकांना रिक्षा व इकोव्हॅन चालविण्याचा अधिकार नसल्याने हा वाद भविष्यात अधिक उफाळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.