महापे-शिळफाटा मार्गावर होणाऱ्या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) वतीने बांधण्यात येणाऱ्या नवी मुंबईतील पहिल्या उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात आले असून, हा पूल पुढील महिन्यात वाहतुकीसाठी खुला होणार आहे. यामुळे महापे, खैरणे एमआयडीसीत जाणाऱ्या वाहनांना जुना मार्ग मोकळा मिळणार असून, ठाणे-बेलापूर मार्गावर शिळफाटा मार्गे येणारी वाहतूक विनाअडसर होऊ शकणार आहे.वसई-विरार ते अलिबागपर्यंत कार्यक्षेत्र असणाऱ्या एमएमआरडीएला नवी मुंबईत काही नागरी कामे करण्याची गळ घालण्यात आली होती. त्यानुसार एमएमआरडीएने जून २०११ रोजी महापे-शिळफाटा मार्गावर ११०० मीटर लांबीच्या उड्डाणपुलाचे काम हाती घेतले आहे. ७१ कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येणाऱ्या या पुलाच्या उभारणीत मध्यंतरी उच्च दाबाच्या वाहिन्या, भूमिगत विद्युत वाहिन्या, गॅस पाइपलाइन यांचा अडसर आल्याने हे काम रखडले होते. ते आता या महिनाअखेर पूर्ण होणार असून, कंत्राटदाराला २५ जानेवारीची डेडलाइन देण्यात आली आहे. त्यामुळे कंत्राटदार आता रंगरंगोटी, विद्युत खांब अशा सुविधांवर शेवटचा हात फिरवण्याच्या तयारीत आहे. या पुलावरून सुमारे ३५ हजार वाहने दिवसाला ये-जा करणार आहेत. खैरणे, महापे, एमआयडीसीत जाणाऱ्या कारखान्यांच्या वाहनांना या उड्डाणपुलामुळे जुना रस्ता मोकळा मिळणार आहे, तर जेएनपीटी, ठाणे, पुणे, मुंबईत कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, मुंब्रा येथून येणाऱ्या वाहनांना उड्डाणपुलाचा आधार मिळणार आहे. पावसाळ्यात या मार्गावर खूप मोठय़ा प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती. त्याला पर्याय म्हणून या पुलाच्या पुढे एमएमआरडीए आणखी एक उड्डाणपूल बांधणार असून, ठाणे-बेलापूर मार्गावर तळवली, घणसोली, सविता केमिकल्स कंपनीजवळ तीन उड्डाणपूल बांधले जाणार आहेत. पालिकेच्या वतीने करण्यात येणारे दिघा ते महापे सिमेंट काँक्रीटीकरण देखील अंतिम टप्प्यात आले आहे. सायन-पनवेल मार्गावर उभे राहिलेले चार उड्डाणपूल आणि येत्या काळात उभे राहणारे चार पूल यामुळे येत्या काळात उड्डाणपुलांचे शहर म्हणून देखील नवी मुंबईची एक नवीन ओळख तयार होणार असल्याचे दिसून येते.