‘लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी’ असे म्हणत सामूहिक नृत्य.. परिसंवाद, चर्चासत्र, ग्रंथदिंडी, काव्यवाचन, मराठी गीतांची मैफल.. आदी कार्यक्रमांद्वारे कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस अर्थात मराठी भाषा दिन राजकीय पक्ष, संस्था, शासकीय कार्यालय, शाळा व महाविद्यालयांत उत्साहात साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे, समाज माध्यमांवरही दिवसभर मराठी दिनाचा जागर सुरू राहिला.नाशिक महापालिकेच्या वतीने कुसुमाग्रज प्रतिष्ठान येथे महापौर अशोक मुर्तडक यांच्या हस्ते कुसुमाग्रजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच कुसुमाग्रज काव्य उद्यानातही कुसुमाग्रजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या वेळी कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे पदाधिकारी उपस्थित होते. कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे कुसुमाग्रज स्मारक येथे ‘कुसुमाग्रज पहाट’ कार्यक्रमात रमाकांत गायकवाड यांचे गायन आणि प्रसाद रहाणे यांच्या सतारवादनाने मराठी दिनास सुरुवात झाली. दुपारच्या सत्रात वि. वा. शिरवाडकर लिखित ‘नटसम्राट’ या चित्रपटाचा मुहूर्त अभिनेते नाना पाटेकर आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. भाजपच्या सांस्कृतिक मंचतर्फे आयोजित व्याख्यानात डॉ. प्रा. वृंदा भार्गवे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमास शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. मनसेने मराठी दिनानिमित्त राजगड या पक्ष कार्यालयावर रोषणाई करीत मराठी दिन उत्साहात साजरा केला. पक्षातर्फे कुसुमाग्रजांच्या निवासस्थानी कुसुमाग्रजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या वेळी जिल्हाध्यक्ष सुदाम कोंबडे व इतर पदाधिकारी उपस्थित होते. मनसेतर्फे दुपारी महात्मा फुले कलादालन परिसरातून ग्रंथदिंडी काढण्यात आली. ही ग्रंथदिंडी शालिमार, संत गाडगे महाराज पुतळा, मेन रोड मार्गे रविवार कारंजा परिसरात आल्यानंतर तिचा समारोप झाला. दरम्यान, मनसेच्या नगरसेवकांनी आपल्या प्रभागात निबंध तसेच वाचन स्पर्धेचे आयोजन केले.दरम्यान, शाळा व महाविद्यालयांत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. शहरातील मा. रा. सारडा कन्या विद्या मंदिरात विद्यार्थ्यांनी भूपाळीपासून ते भैरवीपर्यंतच्या विविध मराठी कविता, गाणी, भजन, गोंधळ सादर केले. काही विद्यार्थ्यांनी कुसुमाग्रजांचा जीवनपट आणि मराठीचे महत्त्व यावर माहिती दिली. नांदगाव येथील मविप्र महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी डॉ. ज्ञानेश्वर बोगीर यांनी मातृभाषेत शिक्षण दिल्यास बालकांमध्ये सृजनशक्तीचा स्वाभाविक विकास होतो व पर्यायाने स्पर्धात्मक जगात उत्कृष्ट व्यक्तिमत्त्वाचे व्यक्ती निर्माण होतात असे सांगितले. यावेळी मराठी विभागाचे स्नातकोत्तर विद्यार्थ्यांनी ‘मराठी ज्ञानभाषा’ विषयावर नाटिका सादर केली. भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांच्या साहित्याची विशेषता यावर प्रा. बी. यू. पवार यांनी निबंधवाचन केले. कळवण येथील जानकाई विद्यालयात मुख्याध्यापक एम.बी.जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथमच अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. अमृतकर यांची संकल्पना होती. या वेळी ‘लाभले आम्हांस भाग्य’ या कवितेवर सार्वजनिक वाचनालयाच्या आवारात समूहनृत्य सादर करण्यात आले.