घणसोलीतून रविवार रात्रीपासून बेपत्ता दोन शाळकरी मुलांचा रेल्वे अपघातात मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी वाशी रेल्वे पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
घणसोली सिंप्लेक्स येथील हनुमान को-ऑप. सोसायटीत राहणारे शुभम मोलावडे (१६) आणि मयूर कुरळे (१५) हे दोघे रविवारी शेजारच्या सोसायटीत पूजा असल्याने त्या ठिकाणी गेले होते. नंतर ते घरी परतलेच नाहीत. त्यांची शोधाशोध केल्यानंतर अखेर सोमवारी दोघांच्या कुटुंबीयांनी रबाळे पोलीस ठाण्यात धाव घेतली. यावेळी घणसोली रेल्वे स्थानकालगत अपघातात दोन मुले ठार झाली असल्याचे त्यांना समजले. त्यानुसार कुटुंबीयांनी वाशी रेल्वे पोलिसांशी संपर्क साधला असता, त्यांची ओळख पटली. रूळ ओलांडताना रेल्वेने दिलेल्या धडकेनेच या दोन मुलांचा मृत्यू झाला असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक परशुराम कार्यकत्रे यांनी दिली आहे.