बदलत्या वातावरणामुळे थंडीच्या मोसमाला उशिरा सुरुवात झाली असून काही दिवसांपासून उरण परिसरातील वातावरणातही गारवा जाणवू लागला आहे. वाढत्या गारव्याचा परिणाम जनजीवनावर होऊ लागला आहे. त्यामुळे उरण तालुक्यात ठिकठिकाणी गारवा दूर करण्यासाठी शेकोटय़ा पेटू लागल्या आहेत. या शेकोटय़ांवर वृद्ध, तरुणही जमा होऊ लागले आहेत. मात्र शेकोटय़ांसाठी लागणारे गवत, झाडांचा पाला तसेच लाकडांचा तुडवडा भासू लागला आहे. त्यामुळे शेकोटय़ाशेजारी बसून शेकोटीवर शेकण्याचा आनंद लुटता येत नाही.
उत्तर भारतात थंडीचा जोर वाढल्याने उरणसारख्या समुद्रकिनाऱ्यावरही गारवा जाणवू लागला आहे. गारव्यात वाढ झाल्याने सकाळी कामावर जाणारे तसेच रात्रीच्या वेळी कामावरून परतणाऱ्यांना गारव्याचा त्रास जाणवू लागला आहे. थंडी आणि गारव्यापासून संरक्षण म्हणून गरम कपडे असले तरी दुचाकी वाहनांवरून प्रवास करणाऱ्यांना गारव्याचा त्रास होत आहे. थंडी आणि गारव्यापासून संरक्षण म्हणून अनेक ठिकाणी शेकोटय़ा पेटविल्या जात आहेत. उरण परिसरातील शेती नष्ट झाल्याने तसेच विकासाच्या नावाने अनेक ठिकाणी झाडांची कत्तल होत असल्याने शेकोटय़ांसाठी लागणारे गवत तसेच लाकडांचा तुटवडा भासू लागला आहे. त्यामुळे थंडीच्या मोसमात शेकोटय़ा पेटवून, शेकोटीशेजारी बसून शेकण्याचा आनंद घेता येत नसल्याचे मत उरणमधील नागरिक मनोज ठाकूर यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे हातात मिळेल ते जमा करून तात्पुरत्या स्वरूपात शेकोटय़ांवर भागवावे लागत असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे.