सत्ताधारी खान्देश विकास व शहर विकास आघाडीच्या जयश्री धांडे यांचा महापौर पदाचा कार्यकाळ पुढील महिन्यात संपणार असल्याने या पंचवार्षिकातील शेवटचे महापौर निवडीच्या हालचाली सत्ताधारी गटाकडून सुरू झाल्या आहेत. त्यासाठी किशोर पाटील यांची तर उपमहापौरपदी अनिल वाणी यांची वर्णी लागणे निश्चित मानले जात आहे.
जयश्री धांडे यांची ऑक्टोबरमध्ये निवड करण्यात आली होती. त्यावेळीही किशोर पाटील यांच्या नावाची अधिक चर्चा होती. परंतु महिलेला संधी म्हणून धांडे यांना प्राधान्य देण्यात आले. ऑक्टोबर २०१२ ते फेब्रुवारी २०१३ असा पाच महिन्यांचा कार्यकाळ त्यांच्यासाठी निश्चित करण्यात आला. हा कार्यकाळ पुढील महिन्यात संपणार आहे. पालिका निवडणूक ऑगस्ट किंवा सप्टेंबर मध्ये होण्याची शक्यता असल्याने सत्ताधाऱ्यांकडून आतापासूनच तयारी सुरू झाली आहे. निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर महापौर हा सर्वदृष्टीने सक्षम असावा असा गटाचा मानस आहे. उपमहापौर राखी सोनवणे यांच्या ठिकाणी शहर विकास आघाडीकडून मिलींद सपकाळे व अनिल वाणी यांची नावे चर्चेत होती. सपकाळे यांची प्रभाग समिती सभापती म्हणून निवड झाल्याने वाणी यांचा मार्ग मोकळा झाल्याचे मानले जात आहे