महाराष्ट्राच्या साहित्य, सांस्कृतिक, नाटय़ क्षेत्रात आपला स्वतंत्र ठसा निर्माण करणारी मुंबई मराठी साहित्य संघ ही संस्था येत्या सोमवारी, २१ जुलै रोजी ८० व्या वर्षांत पदार्पण करत आहे. २१ जुलै १९३५ रोजी स्थापन झालेल्या साहित्य संघाच्या ८० व्या वर्षांतील पदार्पणाच्या निमित्ताने २१ जुलै रोजी मुंबईत गिरगाव येथे एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. उपनगर साहित्य संमेलन, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, अखिल भारतीय मराठी नाटय़ संमेलन, विविध स्मृती व्याख्यानमाला, शारदोत्सव, मान्यवर साहित्यिक, नाटककार यांच्या जन्मशताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने कार्यक्रम, नाटय़ोत्सव, नाटय़प्रयोग, साहित्यविषयक कार्यक्रम संघातर्फे सातत्याने आयोजित केले जातात. साहित्य आणि राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने गिरगावातील साहित्य संघाच्या वास्तूत आपली हजेरी लावली आहे. ८० व्या वर्षांतील पदार्पणाची सुरुवात अण्णासाहेब किर्लोस्कर लिखित ‘संगीत शाकुंतल’मधील नांदीने होणार असून १९३५ आणि १९६४ मध्ये साहित्य संघाच्या नाटय़गृहाच्या उद्घाटनाच्या वेळी हीच नांदी सादर करण्यात आली होती. या वेळी ही नांदी गायक-अभिनेते अरविंद पिळगावकर, चंद्रकांत कोळी, अमोल बावडेकर, महेश सारमंडळी, सुभाष भागवत, नयना आपटे, योजना शिवानंद, नीलाक्षी पेंढारकर, दीपाली भागवत, अरुणा गणपुले, मेधा बापट हे गायक तर मकरंद कुंडले व साई बँकर हे वादक सहभागी होणार आहेत. अष्टदशक वर्षांच्या निमितने साहित्य संघाने ‘संतसाहित्य सेवा गौरव’ हा पुरस्कार सुरू केला असून या कार्यक्रमात दिवाकर अनंत घैसास व गहिनीनाथ महाराज औसेकर यांना प्रदान करण्यात येणार आहे. गिरगावातील साहित्य संघाच्या डॉ. अ. ना. भालेराव नाटय़गृहात सायंकाळी सहा वाजता होणाऱ्या या कार्यक्रमास विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या वेळी साहित्य संघाच्या दोन पुस्तकांचे तसेच वि. स. पागे यांच्या इंग्रजी लेखसंग्रहाचेही प्रकाशन होणार आहे. या कार्यक्रमानंतर गहिनीनाथ महाराज औसेकर आणि त्यांचे चाळीस सहकारी चक्रीभजन सादर करणार आहेत.