बीए, एमए, एलएलबी, बीई अशा अनेक महत्त्वाच्या परीक्षांचे निकाल रखडलेले, निकाल जाहीर केले तर गुणपत्रिका नाही किंवा निकाल तरी प्रलंबित.. या प्रकारच्या असंख्य गोंधळांमुळे मुंबई विद्यापीठाचा परीक्षा विभाग यंदा चर्चेत आहे. तसा तो दरवर्षीच असतो. परंतु यंदाचा गोंधळ हा अभूतपूर्वच म्हणायला हवा. एमएचे तिसरे सत्र सुरू झाले तरी पहिल्या-दुसऱ्या सत्राचा निकाल विद्यार्थ्यांना मिळालेला नाही. त्यामुळे किती विषयांत एटीकेटी आहे ते कळायला मार्ग नाही. हाच प्रकार बीईच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत. बीएचे निकाल न लागल्याने ऑगस्ट उजाडला तरी एमएच्या पहिल्या वर्षांचे प्रवेशच होऊ शकलेले नाहीत. विधी शाखेच्या विद्यार्थ्यांचे तर निराळेच दुखणे. त्यांचा निकाल दरवर्षीच रखडतो. यंदा तो आणखी काही काळ रखडला इतकेच. थोडक्यात, आपल्या निकालांचा ‘निक्काल’ लागल्याचीच भावना विद्यार्थी व्यक्त करीत आहेत. विद्यार्थ्यांची संख्या पाहता मुंबई विद्यापीठासमोर सर्वात मोठे आव्हान टीवायबीकॉमच्या निकालांचे असते. २६ जूनला विद्यापीठाने ५५ दिवसांच्या विलंबाने टीवायबीकॉमचा निकाल ऑनलाइन घोषित केला. पण त्यानंतर महिना होत आला तरी विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणपत्रिका मिळालेल्या नव्हत्या. अजूनही काही महाविद्यालयांना गुणपत्रिका मिळालेल्या नाहीत. निकाल जाहीर केलेल्या ६३ हजार विद्यार्थ्यांपैकी तब्बल शेकडो हजार विद्यार्थ्यांचे निकाल कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे प्रलंबित ठेवले आहेत ते वेगळेच. महाविद्यालयांनी अंतर्गत गुणांची माहिती वेळेत सादर न केल्याने निकालपत्रांच्या छपाईला विलंब झाल्याचे विद्यापीठाचे प्रशासन सांगते. त्यानंतर विद्यापीठाने १७ जुलैला बीएमएसचा निकाल जाहीर केला, परंतु या सुमारे १० हजार विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकाही अद्याप विद्यापीठाने छापलेल्या नाहीत. हीच परिस्थिती दोन आठवडय़ांपूर्वी जाहीर करण्यात आलेल्या टीवायबीएस्सी निकालांची. अंतर्गत मूल्यांकनाचे गुण न मिळाल्याने यापैकी शेकडो विद्यार्थ्यांचे निकाल प्रलंबित आहेत ते वेगळेच. ज्यांना विद्यापीठांच्याच विभागांमध्ये किंवा संलग्नित महाविद्यालयांमध्ये प्रवेश घ्यायचा आहे, त्यांच्या प्रवेशात यामुळे काही बाधा येणार नाही. परंतु मुंबई वगळता इतर किंवा राज्याबाहेरील किंवा देशाबाहेरील विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे करिअरचे नियोजन यामुळे कोलमडले आहे, अशा शब्दांत या विलंबाचे होणारे परिणाम अधिसभा सदस्य सुधाकर तांबोळी यांनी निदर्शनास आणून दिले. बीए, एमकॉम, एलएलएम, एमए या परीक्षांचे निकालही अद्याप लागलेले नाहीत. बीएचा सहाव्या सत्राचा निकाल न लागल्याने एमएची प्रवेश प्रक्रिया रखडली आहे. ऑगस्ट महिना निकाल जाहीर होऊन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात गेल्यास एमएचे वर्ग सुरू होण्यास सप्टेंबर उजाडणार आहे. त्यानंतर अवघ्या दोन महिन्यांत विद्यार्थ्यांनी पहिल्या सत्राचा अभ्यास पूर्ण करून परीक्षेला सामोरे तरी कसे जायचे असा प्रश्न आहे. एमएच्या पहिल्या-दुसऱ्या सत्राचा निकाल लागला नसताना तिसरे सत्र मात्र सुरू झाले आहे. विद्यापीठाच्या ‘इन्स्टिटय़ूट ऑफ डिस्टन्स अॅण्ड ओपन लर्निग’च्या (आयडॉल) हजारो विद्यार्थ्यांच्या निकालांचीही अशीच रखडपट्टी सुरू आहे. संगणक आणि परीक्षा विभागात ताळमेळ नाही निकाल लांबले तरी या आधी निदान चार-पाच दिवसांत गुणपत्रिका तरी मिळायच्या. पण आता महिनामहिना गुणपत्रिका मिळत नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त करीत आहे. अधिसभा सदस्य सुधाकर तांबोळी यांनी काही विद्यार्थ्यांसमवेत कुलगुरूंची भेट घेऊन गाऱ्हाणी कानावर घातली. विद्यापीठाच्या संगणक विभाग आणि परीक्षा विभागामध्ये ताळमेळ नसल्यानेच निकालाचे काम विलंबाने होत असल्याचा आरोप त्यांनी केला. एमकेसीएल जबाबदार टीवायबीकॉमच्या पाचव्या सत्राचा निकाल लागल्याशिवाय खरे तर सहाव्या सत्राचा निकाल जाहीर करणे चुकीचे आहे. परंतु हा मूलभूत नियम धाब्यावर बसवून विद्यापीठाने थेट सहाव्या सत्राचा निकाल जाहीर केल्यानेही अनेक गोंधळ निर्माण झाले आहेत, असे अधिसभा सदस्य संजय वैराळ यांनी निदर्शनास आणून दिले. या गोंधळाचे खापर त्यांनी एमकेसीएल या विद्यापीठाला परीक्षा प्रक्रियेकरिता ऑनलाइन सेवा देणाऱ्या कंपनीवरही फोडले. अनेक महाविद्यालयांनी वेळेत अंतर्गत मूल्यांकनाचे गुण सादर करूनही केवळ एमकेसीएलने विलंब केल्याने ते विद्यापीठाला वेळेत मिळू शकले नाही, असा आरोप त्यांनी केला.