शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निवडणुकीच्या प्रचारादरम्यान दाखविलेले स्वप्न वास्तवात साकारण्यासाठी पालिका शाळांमधील इयत्ता आठवीचे विद्यार्थी व शिक्षकांकरिता विम्याच्या संरक्षणासह तब्बल २२,७९९ टॅबची खरेदी करण्याचा निर्णय सत्ताधारी शिवसेना आणि पालिका प्रशासनाने घेतला आहे. इयत्ता आठवीच्या मराठी, उर्दू, हिंदी आणि इंग्रजी माध्यमांच्या सर्व पाठय़पुस्तकांच्या मसुद्याचा या टॅबमध्ये समावेश करण्यात आला असून त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे ओझे कमी होणार आहे. पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्याच्या उद्देशाने त्यांना टॅब देण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात मराठी, उर्दू, हिंदी आणि इंग्रजी माध्यमांच्या इयत्ता आठवीमधील विद्यार्थी आणि शिक्षकांना टॅब देण्यात येणार आहेत. चालू शैक्षणिक वर्षांमध्ये टेक्नो इलेक्ट्रॉनिक्स या कंत्राटदाराकडून तब्बल २२,७९९ टॅब खरेदी करण्यात येणार आहेत. इयत्ता आठवीमधील विद्यार्थी पुढील वर्षी नववीमध्ये गेल्यावर त्या वर्षीचा अभ्यासक्रम टॅबमध्ये समाविष्ट करण्यात येणार आहे. अशाच प्रकारे या विद्यार्थ्यांना हे टॅब इयत्ता दहावीमध्येही वापरता येतील. २०१५-१६, २०१६-१७ आणि २०१७-१८ या वर्षांसाठी टेक्नो इलेक्ट्रॉनिक्सबरोबर टॅब पुरविणे आणि दरवर्षी त्यातील अभ्यासक्रम बदलण्याबाबतचा करार करण्यात आला असून या कामासाठी या कंपनीला २१,८८,७०,४०० रुपये देण्यात येणार आहेत. विद्यार्थी आणि शिक्षकांना टॅबविषयक प्रशिक्षण देण्याची जबाबदारी या कंपनीवर सोपविण्यात आली आहे. पुढील वर्षी इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी नवे टॅब खरेदी करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य पाठय़पुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ (बालभारती)ची मान्यता घेऊन या टॅबमध्ये इयत्ता आठवीचा अभ्यासक्रम समाविष्ट करण्यात आला आहे. टॅबमुळे विद्यार्थ्यांकडून अधिक सराव करून घेणे, शिक्षकांच्या गैरहजेरीत विद्यार्थ्यांना स्वयंअध्ययन करणे, अनुपस्थितीच्या कालावधीत मागे पडलेला अभ्यास पूर्ण करणे शक्य होणार आहे. सत्ताधारी शिवसेनेच्या पुढाकाराने विद्यार्थ्यांना टॅब देण्यात येत असल्यामुळे विरोधकांना नाके मुरडायला सुरुवात केली आहे. टॅबमध्ये इंटरनेट, वायफाय, यूटय़ूबची सुविधा नाही. त्यामुळे हे टॅब विद्यार्थ्यांना जगाशी कसे जोडणार; तसेच पालिका शाळांमधील असुविधा आणि व्हच्र्युअल क्लासरुम योजनेची अंमलबजावणी याबाबत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पार्टीकडून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. त्यामुळे स्थायी समितीच्या बुधवारच्या बैठकीत टॅबवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपण्याची चिन्हे आहेत.