ठाणे-बेलापूर मार्गावरील घणसोली, कोपरखैरणे, पावणे, तसेच सायन-पनवेल मार्गावरील सानपाडा, वाशी, शिरवणे, उरण फाटा येथील उड्डाणपुलांचा खालील भाग हे मृत्यूचे सापळे म्हणून तयार झाले आहेत. या उड्डाणपुलांच्या खाली गतिरोधक किंवा सिग्नल नसल्याने अनेक अपघात होत असल्याचे दिसून येत आहे. घणसोली रेल्वे स्थानकाबाहेर मंगळवारी दुपारी ठाण्याहून येणाऱ्या एका कारने पुलाखाली वळण घेऊन वाशीकडे जाणाऱ्या एका रिक्षाचालकाला जोरदार धडक मारली. त्यामुळे रिक्षातील चार जण जबर जखमी झाले. ठाणे-बेलापूर मार्ग व सायन-पनवेल मार्गावरील भरघाव वेगासाठी अडथळा ठरू नये म्हणून रेल्वे स्थानकासमोर उड्डाणपूल बांधण्यात आले आहेत. कोटय़वधी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या या उड्डाणपुलांमुळे सरळ मार्गाने जाणाऱ्या वाहनांचा प्रवास सुसाट झाला आहे पण या उड्डाणपुलाखाली होणाऱ्या छोटय़ा, मोठय़ा अपघातांकडे दुर्लक्ष केले जात आहे. घणसोली, कोपरखैरणे, वाशी, सानपाडा येथे रेल्वे स्थानकांमुळे मोठय़ा प्रमाणात गर्दी सकाळ-संध्याकाळ आढळून येते. त्यामुळे या स्थानकांच्या बाहेर प्रवासी भाडय़ासाठी रिक्षाचालकांची तेवढीच गर्दी आहे. महापे, खैरणे, एमआयडीसीत जाण्यासाठी येथून नोकरदारवर्ग रिक्षा करतो. प्रवासी मिळाल्यानंतर रिक्षाचालक या पुलांच्या खालून ऐच्छिक स्थळी जाण्याचा प्रयत्न करतात. त्याच वेळी ठाणे किंवा वाशी येथून भरघाव वेगाने येणाऱ्या वाहनांची या रिक्षाचालकांना धडक बसत असल्याचे अलीकडे नित्याचे होऊन बसले आहे. वाहतूक पोलिसांनी अनेक वेळा यासंदर्भात स्थानिक प्राधिकरण म्हणून पालिकेला पत्रव्यवहार केला आहे. पण त्याला वाटाण्याच्या अक्षता लावल्या जात आहे. त्यामुळे पुलाखालून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा जीव टांगणीला लागला आहे. उड्डाणपूल वाहतुकीस खुला करतानाच या पुलाच्या खाली दुतर्फा गतिरोधक टाकण्याची सूचना वाहतूक पोलिसांनी केल्या आहेत. त्या पालिका गांर्भीयाने घेत नसल्याने पुलाच्या वरील बाजूस सुसाट प्रवास होत असताना खालील बाजूस मात्र प्रवाशांचे जीव जात असल्याचे चित्र आहे.