अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्या नवीन कायद्याप्रमाणे संरक्षण मिळाले आहे. प्रत्येक डॉक्टरांना या कायद्यामुळे अपघातग्रस्तांना उपचार करणे बंधणकारक आहे. त्यामुळे अपघातग्रस्तांना मदत करा, असे आवाहन पनवेलचे उपप्रादेशिक अधिकारी आनंद पाटील यांनी राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानात केले. पळस्पे येथील महिंद्रा ग्लोबल गॅलरीजच्या वर्कशॉपमध्ये हे मार्गदर्शन शिबीर घेण्यात आले. या वेळी उपप्रादेशिक अधिकारी पाटील व डॉक्टर निशिकांत जोशी यांनी चालकांना मार्गदर्शन केले. या वेळी ग्लोबलचे वरिष्ठ व्यवस्थापक अद्वैत हडाळे, रिलेशनशिप व्यवस्थापक अदिम बागवान व इतर मान्यवर उपस्थित होते.देशात वर्षभरात सुमारे एक लाख ३५ हजार जणांना अपघातामध्ये आपले जीव गमवावे लागतात. त्यापैकी महाराष्ट्र राज्यातील १३ हजार, तर रायगड जिल्ह्य़ातील ३०० व्यक्ती अपघातामध्ये बळी जातात. त्यामुळे हे अपघात टाळण्यासाठी वाहने चालविताना चालकांनी संयम बाळगावा; तसेच स्पर्धेत सहभागी झाल्याप्रमाणे वाहने चालवून सुरक्षित प्रवासासाठी स्वत: व इतरांना नियमात वाहने चालविल्यास अपघातामध्ये बळी गेलेल्यांची आकडेवारी शून्यावर येऊ शकते, असे मार्गदर्शन पनवेलचे उपप्रादेशिक अधिकारी पाटील यांनी चालकांना येथे केले. वाहनचालकांनी वाहने चालविताना नियमभंग न केल्यास वाहन अपघात टळू शकतात. यासाठी हे मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले होते. या वेळी चित्रफितीद्वारे चालकांना वाहने चालविताना खबरदारीविषयी माहितीपट दाखविण्यात आला. अपघातानंतर त्या रस्त्यावरून जाणाऱ्यांनी मदतीचे नेमके कोणते कार्य करावे याविषयाची माहिती डॉ. निशिकांत जोशी यांनी या वेळी दिली. अपघातामधील व्यक्तींना इतरांच्या मदतीने वाहनातून काळजीपूर्वक बाहेर काढताना अपघातग्रस्तांच्या शरीरात शिरलेला धातू, प्लॅस्टिक काढताना घ्यावयाच्या वैद्यकीय काळजीविषयीचे मार्गदर्शन या वेळी करण्यात आले. रुग्णवाहिका मदतीला येईपर्यंत अनेकांनी अपघातग्रस्तांच्या मनक्याला मानेखाली आधार द्यावा, असे डॉ. जोशी यांनी सांगितले. ग्लोबल गॅलरीजच्या वर्कशॉपमध्ये या वेळी वाहनाचे इंजिन, स्टार्टर व इतर भाग खुले करून त्याची माहिती देण्यात आली.