कल्याण शहरांचा काही भाग व टिटवाळा परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या टिटवाळ जलशुद्धीकरणाचा पाणीपुरवठा देखभाल व दुरुस्तीच्या कामासाठी दर मंगळवारी बंद ठेवण्याचा निर्णय पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने घेतला आहे. येत्या जुलै महिन्यापर्यंत हा पाणीपुरवठा दर मंगळवारी बंद ठेवण्यात येणार असल्याचे कार्यकारी अभियंता तरुण जुनेजा यांनी सांगितले.
टिटवाळा येथील जलशुद्धीकरणाला केंद्राला चोवीस तास वीजपुरवठा करण्याची सुविधा प्रशासनाने उपलब्ध करून दिली आहे. यापूर्वी हा भाग ग्रामीण भागात येत असल्याने या पाणीपुरवठा योजनेला वीज भारनियमनाचा फटका बसत होता. त्यामुळे टिटवाळा भागाला अनियमित, कमी दाबाने पाणीपुरवठा होत होता. आता २४ तास वीज उपलब्ध राहणार असल्याने मुबलक पाणीपुरवठा या भागाला होणार आहे. पाऊस पडेपर्यंत पाण्याचे योग्य नियोजन व्हावे हाही या बंद मागील उद्देश आहे.