शासनाने ध्वनी प्रदूषणाचे निकष फटाक्यांसाठी वेगळे आणि निवासी विभागासाठी वेगवेगळे केलेले आहेत. केंद्रीय वने आणि पर्यावरण मंत्रालयाने केलेल्या मानकाप्रमाणे संवेदनशील क्षेत्रात ५० डेसिबल, तर फटाक्यांसाठी मात्र ही मर्यादा ४ मीटरपर्यंत १२५ डेसिबल ठेवली आहे. अनेक फटाके १५० डेसिबलपेक्षा जास्त आवाज करतात. कायदेसुद्धा उद्योगांसाठी कसे फायद्याचे आहे, याचा हा उत्तम नमुना म्हणावा लागेल. एका मर्यादेपलीकडे आवाज गेल्यास तो कर्कश वाटतो, त्रास होतो. पर्यावरण संरक्षण कायद्याप्रमाणे दिवसा शांतता क्षेत्रात ५० डेसिबल, रहिवासी क्षेत्रात ५५, व्यावसायिक ६५ आणि औद्योगिक क्षेत्रात ७५ डेसिबल मर्यादा आहे. याचाच अर्थ असा की, यापेक्षा मोठा आवाज आरोग्यास धोकादायक आहे. अनेक फटाके १५० डेसिबलपेक्षा जास्त आवाज करतात. सर्वोच्च न्यायालयाने रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत फटाके फोडण्यास मनाई केली आहे. तरीही देशात कुठेही या आदेशाचे पालन होतांना दिसून येत नाही. दिवाळीत त्यामुळे वायु व ध्वनी प्रदूषण, अपघाताची शक्यता, कचऱ्याची समस्या, पक्षी आणि प्राण्यांना धोका निर्माण होऊ शकतो. वायु प्रदूषणामुळे आरोग्यावर दुष्परिणाम होतो. फटाक्यात आवाज व रंगांसाठी वापरली जाणारी रसायने व धातूंच्या ज्वलनातून सल्फरडाय ऑक्साईड, कार्बनडाय आक्साईड, नायट्रोजन आक्साईड, कार्बन मोनोक्साईड यासारखे विषारी वायू बाहेर पडतात. सोबतच कॉपर, केडिनियम, लीड, मग्नेशियम, सोडियम, झिंक, नायट्रेट, पोटेशियम कॉबरेनेट आदी घातक धातूंचा समावेश असतो. यामुळे हवेत १० व ५० पी.एम. इतके बारीक कण बाहेर पडतात. वायु आणि त्यामुळे फुफ्फूस व श्वसननलिकेचे व धातुमुळे अॅनेमिया, किडनीचे रोग, मज्जासंस्थेचे आजार, मानसिक आजार, कातडीचे रोग, उलटय़ा, असे अनेक आजार होतात. एका मर्यादेपलीकडे आवाज गेल्यास तो नकोसा वाटतो, परंतु आज सगळीकडे वाहने, मशिन्स, डीजे, लाऊड स्पीकर आणि वाहतुकीच्या आवाजांमुळे आधीच प्रत्येक जण कंटाळलेला असून त्यात दिवाळी फटाक्यांच्या असहय़ आवाजाची भर मोठय़ा प्रमाणात पडते. फटाक्यांमुळे दरवर्षी आगी लागून प्राणहानी व वित्तहानी होते. त्यामुळे एकाच शहरात अनेक टन कचरा निर्माण होतो. तो बहुदा पाण्यात जात असल्याने जलप्रदूषण होते. हेच पाणी पिण्याच्या पाण्याच्या संपर्कात येऊन पोटाचे रोग उद्भवतात. फटाक्यांच्या आवाजाने पशु-प्राण्यांनाही त्रास होतो. ते एकतर बहिरे होतात किंवा परिसर सोडून निघून जातात. आतिशबाजी ही चिनी संस्कृती आहे. आता धर्मपंडितांनी, बुद्धीवंतांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी जनजागृती करून नवे पर्याय दिले पाहिजेत. प्रशासनानेही प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजेत. दिवाळी दिव्यांचा सण आहे त्यामुळे फटाके फोडणे निषिद्ध असले पाहिजे. त्याऐवजी घरावर दीपमाला, लेड लाईट्स, लेझर शो, दीपपतंग, संगीत, नृत्य आणि अनेक सामाजिक उपक्रम साजरे करायला पाहिजे. दिवाळी प्रदूषण मुक्त साजरी करावी, असे आवाहन ग्रीन प्लॅनेट सोसायटीचे सुरेश चोपणे यांनी केले आहे.