रस्त्यावर भीक मागणाऱ्या मुलांना शिक्षण देऊन त्यांना गुन्हेगारीपासून दूर नेण्यासाठी मुंबई पोलिसांनी पुढाकार घेतला आहे. दक्षिण मुंबईत ‘परिवर्तन प्रकल्प’ सुरू करण्यात आला असून अभिनेता अजय देवगण याच्या हस्ते या मोहिमेचा बुधवारी शुभारंभ करण्यात आला.शिक्षणाचा अभाव आणि बेरोजगारीमुळे लहान मुले गुन्हेगारीकडे वळतात. अशा मुलांसाठी या प्रकल्पात मुंबई पोलिसांनी पुढाकार घेतला आहे. गिरगावच्या भारती विद्याभवनात झालेल्या एका कार्यक्रमात अभिनेता अजय देवगण याच्या हस्ते या प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला. महिला बालविकास आणि आदिवासी विभागाच्या सहकार्याने आणि स्वयंसेवी संस्थाच्या मदतीने हा प्रकल्प मुंबई पोलीस राबविणार आहे. दक्षिण मुंबईत फासेपारधी आणि वाघ्री समाजाची ९७८ कुटुंबे राहतात. त्यांची बाराशे मुले रस्त्यावर भीक मागत असतात. त्यांना या स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने शाळेत पाठविले जाणार आहे. त्यांना उपजिविकेचे साधन उपलब्ध करुन देण्यासाठी विविध व्यवसायभिमुख अभ्यासक्रमही शिकवले जाणार आहे, असे पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी सांगितले. मुलांना चांगले शिक्षण आणि रोजगार मिळाला तर रस्त्यावरील गुन्हेगारी कमी होईल, परिसर भिक्षेकरी मुक्त होईल असे दक्षिण प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी सांगितले. यापुढे सिग्नलवर भीक मागणारी मुले शाळेत जाऊन आपले आणि आपल्या कुटुंबाचे जीवनमान उंचावतील अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. मुले ही देशाचे भविष्य आहात त्यामुळे तुम्ही शाळेत जा शिक्षण घेऊन परिस्थिीतीवर मात करा, असे आवाहन अभिनेता अजय देवगण याने मुलांना करुन त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले. यावेळी सहपोलीस आयुक्त भुषणकुमार उपध्याय (वाहतूक), धनंजय कमळाकर (कायदा व सुव्यवस्था) आदी उपस्थित होते.