अडीच वर्षांच्या काळात जनतेच्या सहभागातूनच शहरात विविध समाजपयोगी उपक्रम राबवून विकासकामांना गती देऊ शकलो ही मोठी उपलब्धी असली तरी शतकोत्तर महोत्त्सवाचा समारोप आणि ग्रंथनिर्मिती करू शकलो नाही, अशी खंत व्यक्त करून महापौर अनिल सोले यांनी जनतेसह महापालिका प्रशासन व सर्व पक्षीय सदस्यांचे आभार मानले.
महापौर म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर अनेक आव्हाने होती. काही ठिकाणी अडचणी आल्या. मात्र, सर्वाच्या सहकार्यामुळे त्यातून मार्ग काढत शहराच्या विकास कामांकडे अधिक लक्ष दिले. अनेक प्रकल्प मार्गी लागले तर काही अर्धवट असून ते लवकर पूर्ण होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अडीच वर्षांच्या काळात २८९ बैठकी घेतल्या असून ७४० शिष्टमंडळे भेटली. आचारसंहितेचे तीन महिने सोडले तर उर्वरित काळात शहरातील विकास कामांच्या दृष्टीने प्रयत्न केले. वृक्षारोपण, नागनदी सफाई अभियान राबविण्यात जनतेचा मोठा सहभाग मिळाला. शिवाय प्रशासनाचे सहकार्य मिळाले त्यामुळे हे दोन्ही अभियान रावबू शकलो, असेही सोले म्हणाले. एलबीटीमुळे महापालिकेची आर्थिक स्थिती कमकुवत असताना महापालिकेची आर्थिक घडी विस्कटली होती. विकास कामे करताना अनेक अडचणी आल्या. मात्र, त्यावर मात करीत महापालिकेचे प्रकल्प थांबविण्यात आले नाहीत. शतकोत्तर महोत्सवाचा समारोप माझ्या काळात होईल,  असे वाटले होते. ग्रंथाचे प्रकाशनही त्यावेळी करण्यात येईल, असेही सोले म्हणाले.