इंटरनेटच्या सेवेसाठी एका खासगी कंपनीने पनवेल शहरामधील रस्ते भर पावसाळ्यात खोदल्यामुळे रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. या कामामुळे नगर परिषदेच्या तिजोरीत सुमारे पावणेपाच कोटी रुपये जमा झाले असले, तरी ऐन पावसाळ्यात खड्डे खोदण्याची परवानगी प्रशासनाने दिलीच कशी, असा संतप्त सवाल नागरिकांनी विचारला आहे. याबाबत कंपनीने दिलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले असून, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
पनवेलकर आधीच शहरातील रस्त्यांच्या दुर्दशेने हैराण झाले आहेत. अशातच रिलायन्स जिओ कंपनीने इंटरनेट फोर-जी सेवेसाठी केबल वाहिनी टाकण्यासाठी बिग बझार ते तक्का गाव, साई मंदिर रोड तसेच एनएमएमटी बसथांबा ते रेल्वेस्थानक रोड असे रस्ते खोदण्यास घेतले आहेत. साधारण १३ किलोमीटपर्यंतचे हे रस्ते असून खोदकाम परवानगीसाठी रिलायन्स जिओ कंपनीने नगर परिषदेकडे चार कोटी ८३ लाख रुपये जमा केले आहेत. पावसाळ्यात झालेल्या सर्वसाधारण सभेत त्यासाठी रीतसर परवानगी घेण्यात आली आहे, असे कंत्राटदार कंपनीच्या पर्यवेक्षकांनी स्पष्ट केले आहे. यामुळे रहिवाशांनी काही लोकप्रतिनिधी व नगर परिषदेच्या कारभाराविषयी संताप व्यक्त केला आहे. किमान पावसाळ्यामध्ये ही खोदकामे टाळण्यात यावीत, अशी सूचना पनवेलकरांनी लोकप्रतिनिधींकडे केली आहे. पनवेलकरांची मागणी रास्त आणि सभागृहात मांडण्यात आलेली आपली भूमिका चुकीची असल्याची जाणीव काही सदस्यांना निर्माण झाल्यानंतर त्यांनी आता पावसाळ्यातील खोदकाम थांबविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

रिलायन्स जिओ कंपनीला दिले फोर-जी केबल भूमिगत करण्याच्या कामाला कायदेशीर पद्धतीने परवानगी दिलेली आहे. त्यासाठी सभागृहाने मान्यता दिलेली आहे. मात्र परवानगी देण्यात आलेल्या आदेशामध्ये पावसाळा संपल्यानंतर कंपनीने काम सुरू करावे असे म्हटले आहे. या आदेशाचे कंपनीने उल्लंघन केल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. त्याबाबत कंपनीला काम थांबविण्याची नोटीस दिली आहे. कंपनीने हे खोदकाम न थांबविल्यास त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई म्हणून व बांधकाम परवानगी दिलेल्या आदेशाचा भंग म्हणून एमआरटीपी कायद्याखाली पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल करू.
– मंगशे चितळे, मुख्याधिकारी, पनवेल नगर परिषद