समाजाकडून नेहमीच तुच्छतेची वागणूक मिळणाऱ्या तृतीय पंथीयांना विद्यापीठ अनुदान आयोगाने शिष्यवृत्तीत भागीदार करून घेण्याची अधिसूचना काढली आहे. त्यामुळे शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येण्याची या समाजाला एक संधी उपलब्ध होणार आहे.
युजीसीने या संबंधी नुकतीच एक अधिसूचना जारी करून सर्व विद्यापीठांना आणि महाविद्यालयांना तृतीय पंथीयांना स्कॉलरशिप आणि फेलोशिपचा लाभ देण्याचे सूचवले आहे. शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात सर्वानाच सामील करून घेत असताना तृतीय पंथीयांनाही मुख्य प्रवाहात आणण्याचे युजीसीचे प्रयत्न आहेत. युजीसीने शिष्यवृत्तीच्या अनेक योजना सुरू केल्या आहेत. त्याचा लाभ घेऊन तृतीय पंथीयांच्या शिक्षण घेणे अधिक सोपे होईल. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर तृतीय पंथीयांच्या बाबतीत जाहीरपणे मुख्य प्रवाहात सामील करून घेण्याचा हा प्रयत्न आहे.
तृतीयपंथी विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामोरे जावे लागते. त्यांचे पालकही सामान्यांपेक्षा त्यांच्या विशिष्ट समुदायाशी संबंध प्रस्थापित करण्यास पाठबळ देतात. समाजाकडून मिळणारी तुच्छतेची वागणूक, पालकांचे दुर्लक्ष आणि आर्थिक कमकुवतपणामुळे अनेकदा अशा विद्यार्थ्यांना शिक्षण अर्धवट सोडावे लागते. सर्वोच्च न्यायालयाने ही पाश्र्वभूमी लक्षात घेऊन तृतीय पंथीयांची ओबीसीमध्ये नोंद घेण्याचे निर्देश शासनाला दिले आहेत. शिवाय त्यांना शिक्षण आणि रोजगारामध्येही आरक्षण देण्याचे फर्मान सोडले आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अशोक गोमासे यांनी युजीसीच्या निर्णयाचे स्वागत
केले असून तृतीय पंथीयांना उजळ माथ्याने शिक्षण घेता येईल, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.