पंधरवडय़ापूर्वी सलग पाच दिवस झालेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीची नुकसान भरपाई १ एप्रिलपासून दिली जाणार असल्याचे केंद्रीय कृषीमंत्र्यांनी जाहीर केल्यानंतर नुकसानीच्या पंचनाम्यांच्या कामाने चांगलाच वेग पकडला आहे. कृषी विभागाने आतापर्यंत पंचनाम्यांचे ९५ टक्क्यांहून अधिक काम पूर्ण केले आहे. ३८६ बाधीत गावांपैकी ३३७ गावातील कामे पूर्ण झाले. त्यात ४५ हजार २०३ शेतकऱ्यांचे २२ हजार ४७० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
अवकाळी पाऊस व गारपिटीच्या तडाख्यात सापडलेल्या नाशिक जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी पुन्हा एकदा या संकटाचा सामना करावा लागला. द्राक्ष काढणीचा हंगाम सुरू असताना हे संकट कोसळल्याने द्राक्षाबरोबर गहू, कांदा, डाळिंब आदी पिकांचे मोठे नुकसान झाले. मागील पाच महिन्यांपासून सातत्याने नुकसान होत असले तरी शासनाकडून मदत मिळत नसल्याने ग्रामीण भागात संतापाचे वातावरण होते. त्या अनुषंगाने रास्ता रोको, रेल रोको या स्वरुपाची आंदोलने झाली. या घडामोडींच्या पाश्र्वभूमीवर, केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंग यांनी काही दिवसांपूर्वी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. शासनाकडून १ एप्रिलपासून मदतीचे वितरण थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात केले जाईल असे त्यांनी जाहीर केले आहे. या पाश्र्वभूमीवर, प्रशासनाकडून नुकसानीची अंतिम आकडेवारी अर्थात पंचनाम्याचे काम प्रगतीपथावर आहे. अवकाळी पाऊस व गारपिटीचा १२ तालुक्यांना तडाखा बसला. त्यातील ३८६ बाधीत गावांपैकी ३३७ गावांमधील पंचनाम्यांचे काम पूर्ण झाले आहे. त्यात त्र्यंबकेश्वर तालक्यात २६, बागलाण १, नाशिक ७३, कळवण २६, निफाड ५३, सिन्नर ४४, येवला २१, दिंडोरी २५, देवळा १०, चांदवड ४६, मालेगाव ४६ व इगतपुरी ७ या गावांचा समावेश आहे. त्यानुसार त्र्यंबकेश्वर तालुक्यात ८०८.३३ हेक्टर, बागलाण २९०७, नाशिक १५३७, कळवण ८२, निफाड ३८००, सिन्नर ४३७९, येवला २२०४, दिंडोरी ५६७, देवळा १८००, चांदवड ३०४८, मालेगाव १४३५ तर इगतपुरी तालुक्यात १६५ हेक्टरचा समावेश आहे. पंचनामे पूर्ण झालेल्या शेतकऱ्यांची संख्या ४५ हजार २०३ आहे. त्यात त्र्यंबकेश्वर तालुक्यात १२१९, बागलाण ३३७१, नाशिक २३००, कळवण २१६, निफाड ७६१९, सिन्नर १३५००, येवला ३२७५, दिंडोरी ९०७, देवळा ३१००, चांदवड ७८७०, मालेगाव १५०६, इगतपुरी तालुक्यातील ३९० जणांचा बांधीतांमध्ये समावेश आहे.