शहरात दिवसातून दोन आणि रात्री एक वेळ भारनियमन होत असल्याने व्यापाऱ्यांसह विद्यार्थ्यांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान होत असून भारनियमन तत्काळ बंद करण्याची मागणी शिवसेना शहरप्रमुख साहेबराव पगार यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार अनिल पुरे यांच्याकडे निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.
आठवडय़ापासून शहरात सकाळी सात ते नऊ, दुपारी १२ ते तीन आणि रात्री सात ते नऊ यादरम्यान वीज वितरण कंपनीने भारनियमन सुरू केले आहे. तीनही वेळा विद्यार्थ्यांसाठी महत्वाच्या असून विजेअभावी अभ्यासात व्यत्यय येत आहे. गणेशोत्सवाच्या पाश्र्वभूमीवर भारनियमन होत असल्याने नागरिकांमध्ये असंतोष आहे. नियमित देयक भरणाऱ्या ग्राहकांवर हा अन्याय असल्याने भारनियमन बंद न केल्यास आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी पगार यांसह तालुका संघटक संभाजी पवार, माजी उपतालुका प्रमुख संजय रौंदळ, विनोद मालपुरे, राकेश आहेर, राहुल पगार आदी उपस्थित होते.