आपली संस्कृती महान म्हणून आपण हजारो र्वष गोडवे गायले. पण सध्या समाजात ज्या दुर्दैवी, अप्रिय घटना घडत आहेत त्या पाहता आता प्रत्येक घटकाने आपल्या संस्कृतीमधील दोष दूर करून मूल्यमापन करण्याची वेळ येऊन ठेपली आहे, असे प्रतिपादन डॉ. मंगला नारळीकर यांनी येथे केले. कल्याणमधील स्त्री शिक्षण मंडळाच्या अष्ट दशकपूर्ती सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात डॉ. नारळीकर बोलत होत्या. संस्कृतीचे मूल्यमापन करून आपण सहजीवनाने एकत्र कसे राहू शकू. समाजाला कसे संघटित करून समाजाला पुढे नेऊ याचा विचार सर्व पातळ्यांवर झाला पाहिजे तरच संस्कृतीचे गोडवे गाण्यास आपण लायक ठरू. अन्यथा दुर्दैवी घटनांच्या पातकात आपण अडकून पडू, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. परदेशात महिलेला पतीची, कुटुंबीयांची साथ असेल किंवा घरी नोकर असेल तरच जीवनाची पुढील वाटचाल करता येते. पण भारतात एकत्र कुटुंब पद्धतीमुळे महिलांना शिक्षण, नोकरी यामध्ये मुक्तद्वार असते. या माध्यमातून एक चांगल्या संस्काराची रुजुवात होत असते. त्यातून पुढील पिढय़ांचे हित जपता येते, असे डॉ. नारळीकर यांनी सांगितले. मुलांवर शालेय जीवनापासून स्त्री-पुरुषांचा आदर या गोष्टी शिकवल्या पाहिजेत. पाश्चात्त्यांच्या प्रवाहात राहून आपण आपल्या संस्कृतीला उलटय़ा दिशेने नेत आहोत. हे थांबविले पाहिजे, असे त्या म्हणाल्या.