ठाणे तसेच डोंबिवली परिसरातील जलवाहिन्यांच्या देखभाल व दुरुस्तीच्या कामासाठी मंगळवारी (आज) पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय या दोन्ही शहरांच्या प्राधिकरणाने घेतला असून त्यापुढील दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.
ठाणे महापालिकेच्या पाणीपुरवठा योजनेतून शहराला २०१ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. या योजनेच्या देखभाल दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. सकाळी नऊ ते बुधवार सकाळी नऊ असा २४ तास पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे ठाणे शहर, पाचपाखाडी, ऋतुपार्क, साकेत, महागिरी, नौपाडा, उथळसर, वागळे इस्टेट, लोकमान्य नगर, इंदिरानगर, श्रीनगर, शास्त्रीनगर, सुरकरपाडा, जॉन्सन, इटर्निटी, सिद्धेश्वर, वृंदावन, श्रीरंग, चरई, कळवा, खारेगांव रेतीबंदर, मुंब्रा, समतानगर, गांधीनगर, घोडबंदर रोड, आझादनगर, डोंगरीपाडा, वाघबीळ, ओवळा, माजिवडा, बाळकुम, मानपाडा, ढोकाळी, कोलशेत, ब्रह्मांड, पवारनगर, टिकुजिनीवाडी, विजयनगरी, घोडबंदर रोड व खारटन रोड परिसरातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ तसेच ‘स्टेम’ प्राधिकरणाकडून पाणीपुरवठा सुरू राहणार असल्याने कळवा, मुंब्रा, खारेगाव भागातील पाणीपुरवठा नियमित असेल, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली.   डोंबिवली शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नेतिवली येथील जलशुद्धीकरण केंद्रात  देखभाल दुरुस्तीचे काम करण्यात येणार असल्यामुळे डोंबिवली शहराचा पाणीपुरवठा सकाळी ६ ते रात्री १० वेळेत बंद राहणार आहे. नागरिकांनी पाण्याचा मुबलक साठा घरात करून ठेवावा, असे पाणीपुरवठा विभाग कार्यकारी अभियंता तरुण जुनेजा यांनी सांगितले.