उरण तालुक्यात मोकाट गुरांचा प्रश्न गंभीर बनला आहे. भर रस्त्यात ही गुरे ठिय्या मारून बसत असल्याने त्यातून वाट काढताना वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे. अनेकदा वाहनांची धडक लागल्याने गुरांना प्राण गमवावे लागत असल्याच्या घटना घडत आहे. दुसरीकडे रात्रीच्या वेळी रस्त्यात बसलेल्या गुरांचा अंदाज न आल्याने वाहन अपघातांचे प्रमाण वाढत आहे. रायगड जिल्ह्य़ातील सर्वाधिक औद्योगिकीकरण झालेला उरण तालुक्यात शेतीची प्रमाण कमी आहे. यात औद्योगिकमध्ये मोठय़ा प्रमाणात शेत जमीन गेली आहे. घराजवळ असलेले गुरांचे गोठे आता नाहीसे झाले आहे. यामुळे अनेकांनी गुरे मोकाट सोडली आहेत. या गुरांनी शहरातील रस्त्यांवर बिनधिक्कतपणे ठिय्या मारला आहे. उरण पनवेल रस्त्यावर अनेक ठिकाणी या मोकाट गुरांमुळे अघोषित रास्ता रोको होत असल्याने वाहन चालक व प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. त्याचप्रमाणे यामध्ये उरण-पनवेल राज्य मार्ग तसेच राष्ट्रीय महामार्ग ४ ‘ब’वरील अवजड वाहनांच्या धडकेत गुरे मरण्याची संख्या अधिक आहे. दुसरीकडे गुरे अनेक ठिकाणी रात्रीच्या वेळी रस्त्यातच बसलेली असल्याने वाहन चालकांना त्याचा अंदाज येत नसल्याने अपघाताचीही शक्यता वाढली आहे. मोकाट गुरांचा बंदोबस्त करण्यासाठी शासनाचे काही नियम आहेत. त्यानुसार शहर व तालुक्यात पांजरपोळची व्यवस्था असणे गरजेचे असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केलेले आहे.