आदिवासीबहुल नंदुरबारसह संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात होलिकोत्सवाची तयारी पूर्णत्वास गेली असली तरी यंदा या सणावर अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे सावट आहे. गतवर्षी दुष्काळी स्थिती होती. धार्मिक सणांची परंपरा राखताना पर्यावरणाचे संतुलन राखले जावे, याकरिता काही लोकप्रतिनिधी आणि पर्यावरणवादी संस्था पुढे सरसावल्या आहेत. वृक्षतोड टाळण्यासाठी होळीसाठी लाकडाचा वापर न करता गवऱ्यांचा प्रामुख्याने वापर करावा, असे आवाहन संबंधितांनी केले आहे. तथापि, गवऱ्यांच्या मागणीत कमालीची वाढ झाल्यामुळे त्यांची किंमत चांगलीच कडाडली आहे. सातपुडा पर्वतराजीत होळीला दिवाळी सणाइतकेच महत्त्व असून राजेशाही थाटातील होलिकोत्सवासाठी आदिवासी बांधव सज्ज झाला आहे.
यंदा होळी, धूलिवंदन व रंगपंचमी या सणांवर नैसर्गिक आपत्तीचे सावट आहे. नाशिकसह धुळे, जळगाव व नंदुरबारमध्ये होलिकोत्सवाची तयारी केली जात असली तरी नेहमी दिसणारा उत्साह मात्र लोप पावल्याचे दिसत आहे. शहर व परिसरात बच्चे कंपनीकडून होळीची तयारी आदल्या दिवशीपासून सुरू झाली. होळीत लाकडाचा वापर टाळण्यासाठी गवरींचा मोठय़ा प्रमाणात वापर केला जातो. यामुळे त्यांच्या किंमतीतही लक्षणीय वाढ झाली आहे. नाशिक शहरात गवऱ्यांचे दर ६०० ते ७०० रूपये शेकडय़ांवर पोहोचल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले. मागील चार ते पाच महिन्यांपासून सातत्याने गारपीट व अवकाळी पावसाचा सामना करावा लागत आहे. काही दिवसांपूर्वी नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील काही भागात पुन्हा अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यात कृषीमालाचे मोठे नुकसान झाले. या संकटाचे सावट असल्याने ग्रामीण भागात नेहमीसारखा उत्साह नसल्याचे चित्र आहे.
पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी अर्थात वृक्षतोड रोखण्यासाठी गवऱ्यांचा वापर करावा तसेच पाण्याचा अपव्यय होऊ नये म्हणून रंगपंचमी कोरडय़ा पद्धतीने साजरी करावी, असे आवाहन विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि पोलीस यंत्रणेने केले आहे. होलिकोत्सवात गवऱ्यांचा वापर करून धार्मिक परंपरेचे जतन करावे, असे आवाहन केले आहे. पर्यावरणाचे संतुलन व धार्मिक सणांची परंपरा या दोघांचा समतोल साधणे आवश्यक आहे.
उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासींचा होळी हा पारंपरिक पण जिव्हाळ्याचा सण! नंदुरबार व धुळे जिल्हय़ात भिल्ल, पावरा, कोकणी, मावची, धानका या आदिवासी जमातींची मोठय़ा प्रमाणात वस्ती आहे. त्यांच्या जीवनात ‘होळी’ हे आनंदपर्व असून त्याला गुरुवारपासून सुरुवात होत आहे. त्या निमित्ताने सतत पाच दिवस गावागावात पारंपरिक नृत्य आणि लोकसंगीताची अनोखी मेजवानी झडते. परगावी नोकरीसाठी गेलेले सुशिक्षित तरुणही होळीसाठी आपल्या गावी परतले आहेत.
नंदुरबार जिल्ह्याच्या शहादा, धडगाव व अक्कलकुवा तालुक्यातील अनुक्रमे गणोर, मांडवी, काठी, डाब, असली, आमलीबारी येथील होळ्या प्रसिद्ध आहेत. पूर्वी भिल्ल लोकांची संस्थाने होती. त्यातील पहिले संस्थान ‘दाब’ अथवा ‘डाब’ होय. पूर्वी एकच राज्य होते. त्यानंतर काठी, सिंगसपूर, रायसिंगपूर, नाला, सागरबारा, गंठा, भगदरी वगैरे संस्थाने झाली. आदिवासींचे प्रमुख कुलदैवत याहामोगी, राजा पांढा, गांडो ठाकूर. दिवाळी व होळी याचे संदर्भ या गावाशी जोडले जातात. येथील होळी प्रसिद्ध आहे, परंतु अलीकडे काठी या संस्थानच्या होळीला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. संस्थानिकांची ही होळी पहाटे पाच वाजता पेटविली जाते. ही होळी उंच अशा बांबूची असते. होळीसाठी लागणारा बांबू प्रथा व परंपरेनुसार गुजरात राज्याच्या जंगलातून आणला जातो. तो मानही विशिष्ट लोकांचा असतो. या होळीसाठी पाडय़ा पाडय़ातील आदिवासी बांधव आपल्या ढोल पथकांसह दाखल होतात आणि रात्रभर पारंपरिक नृत्य सादर करीत असतात. त्यांच्या रंगबेरंगी पोशाखांनी, पारंपरिक विविध वाद्यांच्या नादस्वरांनी या भागातील वातावरण भारावून जाणार आहे.