गेल्या आठवडय़ात चांगली सुरुवात केल्यानंतर जिल्ह्य़ात पुन्हा पावसाने फिरवलेली पाठ.. आणि महागाईने वर काढलेले तोंड.. या कचाटय़ात सापडलेल्या सामान्यांना यंदाचा श्रावण महिना फारसा आनंदाचा न जाण्याचीच चिन्हे आहेत. विदर्भावर दुष्काळाची गडद छाया असताना नागपूरही त्याला अपवाद राहिलेले नाही. भाज्यांचा पुरवठा करणारा शेतकरीच आकाशाकडे डोळे लावून बसलेला असल्याने भाज्यांचे भाव यंदाच्या श्रावणमासात गगनाला भिडण्याची दाट शक्यता आहे. पाऊस पडलाच नाही तर पुढील महिन्यापासून परिस्थिती आणखीनच गंभीर होण्याचे संकेत आहेत.
पावसाच्या दृष्टीने आषाढ तसा कोरडाच गेल्याने श्रावणमासात अपेक्षा आहेत. मात्र, दूरदूरवर आभाळात पावसाच्या ढग तुरळक प्रमाणातच दिसत असल्याने श्रावणातही घननिळा बरसेलच याची सध्या तरी शाश्वती नाही. या सर्व पाश्र्वभूमीवर गेल्या काही दिवसात भाज्यांचे भाव वाढण्यास सुरुवात झाली आहे. श्रावण महिन्याला प्रारंभ झाला असून या सणासुदीच्या दिवसात भाज्याचे भाव आणखी वाढण्याची शक्यता भाजी विक्रेत्यांनी वर्तविली आहे.
नागपंचमी, पोळा, गणपती हे सण ऑगस्ट महिन्यात असून महालक्ष्मी पूजन सप्टेंबर महिन्यात आहे. त्यामुळे सणासुदीच्या दिवसात भाज्यांचे भाव आणखी वाढण्याची चिन्हे आहेत. मान्सून सुरू झाल्यानंतर जवळपास दीड महिना पाऊस नसल्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले होते. गेल्या आठवडय़ात तीन दिवस पाऊस झाला. मात्र, त्यानंतर जिल्ह्य़ात पावसाने तोंड लपविल्याने फळ व पालेभाज्यांची आवक घटली आहे. एरव्ही पावसाळ्यात भाजीपाला महाग होतो. मात्र, यंदा काही भाज्यांनी तर कळसत गाठला आहे. जेवणाचा आस्वाद वाढवणारी कोथिंबीर १५० ते २०० रुपये प्रतिकिलो असून अन्य भाज्या ८० ते १०० रुपये किलो भावाने विक्रीला आहे. मेथीसुद्धा १०० रुपये किलोप्रमाणे विक्रीला आहे. महागाईमुळे अनेकांच्या घरातील बजेट बिघडले आहे.
नागपुरात येणारा भाजीपाला नागपूर जिल्ह्य़ातील आसपासच्या गावातून येत असला तरी आंध्रप्रदेश, नाशिक आणि विदर्भातील अन्य जिल्ह्य़ांतून मोठय़ा प्रमाणात येत असतो. टोमॅटो, फ्लॉवर, कोथिंबीर, मेथी, मिरची या रोजच्या जेवणात हमखास आढळणाऱ्या भाज्यांचे भाव अधिकच वाढले आहे. परिणामी गृहिणींपुढे भाज्यांचा यक्षप्रश्न अधिकच गंभीर होणार आहे. साधारणत: श्रावणात शाकाहार वाढतो, साहजिकच या महिन्यात भाज्यांची मागणी मोठी असते. आवक आणि मागणी या प्रमाणामुळे भाज्यांच्या दरातही चढउतार होत असतात. मात्र, यंदाची परिस्थिती त्याला अपवाद आहे. भेंडी, दुधी भोपळा, फ्लॉवर, शिमला मिरची, पालक, गाजर, पोपट आणि कोबी यांच्या दरातही १५ ते २० टक्के वाढ झाली असल्याचे कॉटेन मार्केटमधील भाजी विक्रेता संघाचे सदस्य राजाभाऊ पत्राळे यांनी कबूल केले. काही भाज्यांच्या दरात वाढ झाली असली तरी आवक कमी झालेली नाही. मात्र पावसाने अशाच प्रकारे दांडी मारली तर काही खरे नाही, असे पत्राळे यांनी सांगितले.
विदर्भाल काही जिल्ह्य़ांमध्ये भाज्यांचे भाव अजून आवाक्यात आहेत. बटाटा, कांदे ३० ते ३५ किलोप्रमाणे विक्रीला आहेत. या दरवाढीचा फटका ग्राहकांबरोबरच लहान हॉटेलचालक, भेळविक्रेते व भोजनालयांनाही बसत आहे. दैनंदिन व जीवनावश्यक वस्तूंचे दर विविध कारणाने गगनाला भिडत आहेत. अजूनही काही दिवस पाऊस आला नाही तर  भाज्यांचे दर चढेच राहतील, अशी प्रतिक्रिया कॉटेन मार्केटमधील बाजारातील भाजी विक्रेत्यांनी व्यक्त केली.

भाज्यांचे दर प्रतिकिलो रुपयांमध्ये
पोपटाच्या शेगा १५०, टोमॅटो ८० ते १००, पालक ८०  
भेंडी  ६०, चवळी ४० ते ५०, शिमला मिरची ५० ते ६०, कारले ४० ते ५०, काकडी ३५ ते ४०, ढेमस  ७० ते ८०,
गाजर  ८० ते १००, तोंडले  ४० ते ५०, कोहळे २० ते २५,
मेथी १०० ते १२५, आले  ८० ते १००, लसूण ८० ते १००,
मुळा   ६० ते ८०, पत्ताकोबी  ५०, सुरई ४० ते ५०,
भेंडी ६० ते ८०, परवळ ६० ते ७०, गवार   ५० ते ६०,
लवकी ४० ते ५०, दुधीभोपळा ३० ते ४०, लिंबू प्रतिनग १ रुपया