विदर्भात काँग्रेस आणि राष्ट्रवादीला अपेक्षित यश न मिळाल्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये नेत्यांविरोधात कार्यकर्त्यांंमध्ये धुसफूस सुरू झाली असून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. नागपूर जिल्ह्य़ात भाजपाला ११, काँग्रेसला केवळ १ जागा मिळाली आणि राष्ट्रवादीला एकही जागा कायम राखता आलेली नाही. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा सफाया झाल्यानंतर दोन्ही पक्षांनी चिंतन बैठका घेऊन विधानसभा निवडणुकीत त्याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी शहर आणि जिल्हा पातळीवर नेते आणि कार्यकर्त्यांंनी एकमेकांना विश्वासात घेऊन काम सुरू केले. संघटन वाढविण्यावर भर देण्यात आला. मात्र, विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये जागा वाटपावरून पुन्हा अंतर्गत धुसफूस सुरू झाली आणि नेते व कार्यकर्ते उघडपणे बोलू लागले. काही प्रमुख कार्यकर्ते उमेदवारी न मिळाल्याने बंडखोरी करून पक्षाविरोधात निवडणूक लढले. निवडणुकीपूर्वी झालेल्या काँग्रेसच्या सभेत माजी खासदार विलास मुत्तेमवार यांनी तर मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांच्या विरोधात उघड नाराजी व्यक्त केल्यानंतर ती या निवडणुकीच्या प्रचारात दिसून आली. निवडणुकीच्या काळात तर काँग्रेसच्या अनेक वरिष्ठ नेत्यांनी विदर्भाकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे सामान्य कार्यकत्यार्ंमध्ये नाराजी होती. शिवाय, पक्षात सामान्य कार्यकत्यार्ंची किंमत होत नसल्याने काँग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे आणि राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष अजय पाटील यांच्याविरोधात त्यांची नाराजी होती. त्यामुळे निवडणुकीपूर्वी अध्यक्ष हटावची मागणी करण्यात आली होती. मात्र, पक्षातील वरिष्ठांनी निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर सर्वाना एकत्र आणले होते. मुत्तेमवार यांना पक्षातील काही नेत्यांचा विरोध असला तरी त्यांनी नागपूर आणि जिल्ह्य़ाची धुरा एकहाती सांभाळून सर्वाना सर्व नेत्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला तरी अंतर्गत धुसफूस सुरू होती आणि ती निवडणुकीच्या निकालानंतर आता बाहेर निघाली आहे. काँग्रेसचा नागपूर जिल्ह्य़ात सफाया झाल्यानंतर आता कार्यकर्ते उघडपणे बोलू लागले आहेत. अजय पाटील यांनी पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारली असली तरी त्यांच्याविरोधात पक्षाचे कार्यकर्ते उघडपणे बोलत आहेत. पाटील यांनी केवळ पश्चिम नागपूर मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले. त्यामुळे त्यांची पदावरून हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादीच्या युवा कार्यकत्यार्ंकडून होत आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा पराभव झाल्यानंतर पक्षाचे नेते आणि उमेदवार मोदी लाटेचा परिणाम असल्याचे बोलत असले तरी कार्यकर्त्यांंना ते मान्य नाही. पक्षातील अंतर्गत राजकारणामुळे काँग्रेस संपल्याचे कार्यकर्ते बोलू लागले आहे. उत्तर नागपुरात शहर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी डॉ. नितीन राऊत यांच्याविरोधात भूमिका घेतली होती. त्यामुळे त्याचा त्यांना फटका बसला. दिवाळीचे दिवस असल्यामुळे दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आणि स्थानिक नेते घरगुती कामात व्यस्त झाले असले तरी दिवाळीनंतर मात्र ही धुसफूस उघडपणे बाहेर येण्याची शक्यता आहे.या संदर्भात काँग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे म्हणाले, नागपूर शहरात सहाही जागेवर काँग्रेसच्या झालेल्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत असून येणाऱ्या काळात शहराच्या विकास कामावर आम्ही जोर देणार आहे. पक्षातील कार्यकत्यार्ंमध्ये नाराजी असली तरी निवडणुकीच्या काळात सर्वानी कामे केली आहे. दिवाळी आटोपल्यानंतर पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यात पराभवाची कारणे शोधू.